CONVERSATION
Girl sitting on the rock
CONVERSATION
Girl
CONVERSATION
rapid sketching
CONVERSATION
man in specs
CONVERSATION
flower buds
CONVERSATION
अखेरचा हा तुला दंडवत !!
बाळासाहेबांनी हे काय केले? का अचानक सोडून गेले? दिवाळी पासूनचं कसे तरी वाटत होते..मन उदास होते होते. पण काल साहेबांची प्रकृती सुधारते ऐकून बरे वाटले होते. आणि आज अचानक ते सोडून गेले. खूप कसेसेच झाले..शब्दात न सांगता येण्यासारखे. दसऱ्याच्या भाषणात जेव्हा त्यांनी जय महाराष्ट्र केला तेव्हाच मनात शंकेची पाल चूकचुकली होती. कधी न कधी ते जाणार होते पण मन मानायला तयार नव्हते. तो जय महाराष्ट्र त्यांचा शेवटचा जय महाराष्ट्र असेल असे वाटले नव्हते.
बाळासाहेब!!!! कोण आहेत ते? का त्यांच्याबद्दल एवढी आस्था वाटावी. काय केले त्यांनी असे की त्यांची काळजी वाटाला वी. त्यांची आठवण यावी? ह्या प्रश्नांची उत्तरे आयुष्यभर सापडणार नाहीत? खरच खूप वाईट वाटतेय. घरातकोणी जवळचा नातेवाईक गेल्यासारखे. मन खूप बेचैन झाले आहे. खूप कोंडमारा होतोय. जीव अडकल्यासारखा झालाय. लवकर निचरा नाही झाला तर हालत खराब होईल.....पण निचरा होणेहि शक्य नाही. खरचं बाळासाहेब गेलेत. एवढे दिवस फक्त अफवा येत होत्या. आज खरचं साहेब गेलेत, तेच ते शिवसेनाप्रमुख, तेच ते व्यंगचित्रकार, तेच ते फाटक्या तोंडचे, तेच ते निर्भीड राजकारणी, तेच ते जहाल हिंदुत्ववादी, तेच ते आयुष्यभर पाकड्यांना शिव्या घालत आले....तेच ते....तेच ते...आज सोडून गेलेते. अजून हि विश्वास नाही बसत आहे.
सात वाजल्यापासून सर्व टीव्ही ची चानेल्स बघून झाली पण कोणीच सांगत नाही आहे की बाळासाहेबांची प्रकृती आता स्थिर आहे. सगळेच सांगताहेत की बाळासाहेब गेलेत. सर्वाना सोडून...आता पर्यंत एकच असा राजकारणी आहे...ज्याच्यासाठी मला खरच रडावेसे वाटतेय. अगदी धाय मोकलून रडावेसे वाटतेय. माझ्यासाठी ते पहिले राजकारणी असतील आणि कदाचित शेवटचे राजकारणी ज्यांचासाठी माझ्या डोळ्यात अश्रू येतील. त्यांचासारखे महामानव एकदाच जन्माला येतात. शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर नंतर ते एकच असे नेते असतील ज्यांच्या जाण्यामुळे समाज खऱ्या अर्थाने अनाथ झाला असेल. खरच पोरके झाल्यासारखे वाटतेय. अगदी रिते रिते झालाय. प्रवासातून येताना काही तरी महत्वाची गोष्ट मागे गाडीत राहून गेली आणि ती परत मिळण्याची शेवटची आशा हि संपल्यावर जसे वाटते तसेच काहीतरी आता वाटतेय. उद्या त्यांचे ह्या पृथ्वीतलावरचे उरले सुरले अस्तित्वही नष्ट होणार. नाही सहन होत आहे हि कल्पना.
चार / पाच तास टीव्ही बघून शेवटी चादर ओढून झोपायला घेतले तरी झोप येत नव्हती. बेचैनी वाढत होती...कोणाशी तरी बोलावेसे वाटत होते. मन मोकळे करावेसे वाटत होते. म्हणून उठलो आणि रात्री साडे बारा वाजता लिहायला बसलोय. मी असे कुठल्या राजकारणी नेत्यासाठी एवढा बैचेन होईन असे कधी वाटले नव्हते...पण इथेच बाळासाहेबांचे प्रेम आहे. बाळ नावाचा बाप माणूस होता. मी राज ठाकरेच्या काय भावना/ मनस्थिती असेल ते समजू शकतो, शिवराय गेल्यावर मावळ्यांची काय मनस्थिती झाली असेल ती मी आता अनुभवतोय. स्वराज्य नसेल तरी बाळासाहेब राजे होते, सम्राट होते. देव माणूस होते.
देवांचे बोललेले शब्द जसे कधी बदलत नसतात. तसे बाळासाहेबांचे शब्द होते. मला नाही आठवत ते कधी असे बोलले असतील कि मी हे वाक्य कधी बोललोच नाही किंवा माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला आहे. ते जे काही बोलले त्याबद्दल कधी त्यांना माफी मागावी लागली नाही, त्यांना कधी आपले शब्द मागे घ्यावे लागले नाही. निधड्या छातीचे वाघ होते ते. एकदा डरकाळी फोडली कि फोडलीच. तो मी नव्हेच असे कधी त्यांच्या बाबतीत झालेच नाही. पोलीस, कायदा, सरकार कश्या कश्याला ते घाबरले नाहीत. किडकिडीत बांध्याच्या शरीरात अपार मानसिक ताकत होती. तीच ताकत त्यांनी मराठी माणसात ओतली. बाबरी मशीद पाडल्यावर जेव्हा मशीद कोणी पडली ह्याची चौकशी चालू झाली आणि भाजपचे सर्व नेते मूक गिळून बसले होते.. तेव्हा हा ढाण्या वाघ बांद्र्यात बसून डरकाळी फोडत होता. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे..गर्व आहे. "गर्व से कहो हम हिंदू है" हे त्यांचे वाक्य त्यांनी सार्थ करून दाखवले. असे होते माझे बाळासाहेब.
शिवसेना उभी करायसाठी घेतलेले त्यांनी मेहनत, रेषांवरचे त्यांचे प्रभुत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, मराठी माणसासाठी त्यांची लढाई, कधीही लिहून न आणलेली खणखणीत आवाजातली त्यांची भाषणे, एक उत्कृत्ष्ट वक्ता, एक प्रेमळ नेता, एक श्रेष्ठ हिंदू नेता हे सगळे सगळे कायमचे संपले आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तुमच्या दारी आलेला कधीच रिकाम्या हाताने परत गेला नसेल अगदी यमराजाला पण तुम्ही दोन दिवस थांबवून ठेवले पण जाता जाता त्याची इच्छा पूर्ण केली. आज देशातल्या कोणी नेत्याने जर मराठी किंवा हिंदू वर आरोप केले तर आपल्या अग्रलेखातून त्याला सडेतोड उत्तर देणारे कोण नसेल. पाकिस्तानच्या नावाने शंख करणारा कोणी नसेल. आता बीसीसीआय न भिता पाकिस्तान बरोबर सामने खेळवू शकेल आणि आम्ही मुर्दाडा सारखे बघत राहू. आमच्या चेतना जागवणारा, रक्त उसळवणारा आमचा लाडका नेता नसेल.
एक भयाण पोकळी निर्माण झालीय आणि कोणीतरी जोर जोरात पाय पकडून त्या पोकळीत खेचतय....हतबल झालोय... शरीराची आणि मनाची ताकत दोन्हीही संपत चालल्या आहेत. बाळासाहेब...तुम्हीच बाहेर काढू शकता होता ह्यातून आणि तुम्हीच सोडून गेलात वाऱ्यावर...का ?? हा हक्क तुम्हाला कोणी दिला? आता खिडकीतून हात कोण दाखवेल तुमच्या शिवसैनिकांना? आमच्या हक्कासाठी कोन नडेल? आयुष्यात एक खंत नक्कीच राहील की तुम्हाला प्रत्यक्ष्यात कधी पाहू शकलो नाही. माझ्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू शकणार नाही की मी शिवरायांसारखा एका महान नेत्याला बघू शकलो नाही.
आयुष्यभर हि खंत राहील.....आयुष्यातली हि पोकळी कधीच भरणार नाही. एक नक्की की स्वर्गातील इंद्रदेव ही घाबरला असेल. पृथ्वीवरचा महान नेता....महाराष्ट्राचा सम्राट येतोय. तिथेही तुम्ही भगवा फडकवाल ह्यात शंका नाही. महादेव तुमच्या आत्म्याला शांती देवो.
जय महाराष्ट्र !!!!
CONVERSATION
Ganapati
CONVERSATION
Ganesh Immersion 2012
CONVERSATION
Lalbaugcha raja 2012
CONVERSATION
Lalbaugcha Raja 2012
CONVERSATION
Gitanjalee Mandal's Bappa
CONVERSATION
रसग्रहण- देवों के देव महादेव
रसग्रहण- कहानी महादेव की
देवों के देव महादेव
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मनाला जास्त भावणाऱ्या
गोष्टी, कथा, वस्तू सर्व काही रसग्रहण ह्या सदराखाली मांडायच्या आहेत. खूप काही
आवडत्या, उपभोगायुक्त बाबींबद्दल लिखाण करायचे आहे. त्याच सदरातील पहिली पोस्ट.
रसग्रहणाची सुरुवात करण्यासाठी ‘महादेव’ सारखा दुसरा चांगला पर्याय नाही.
लाईफ ओके ह्या नवीन चालू झालेल्या वाहिनी वर ‘कहानी महादेव की’ नावाची नवीन मालिका चालू झाली. नवीन म्हणजे तसे आता
तिचे २२० हून अधिक भाग झाले आहेत. तश्या पौराणिक कथावर आधारित खूप काही मालिका
चालू असतात. काही पौराणिक मालिका तर सास बहूच्या डेली सोप सारख्या काही तरी न
ऐकलेल्या कथा दाखवत कितीतरी महिने चालू आहेत. पण ‘कहानी महादेव की’ मालिका ह्या सर्व टिपिकल पौराणिक मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. रामायण,
महाभारत आणि काही वर्षापूर्वी परत नवीन आलेले रामायण ह्या मोजक्या पौराणिक मालिका
सोडल्या तर मी सहसा इतर पौराणिक मालिका बघत नाही. आज कालच्या पौराणिक मालिकेत
दाखवलेले देवांचे चमत्कार, वेडीवाकडी ग्राफिक्स, सहज कमतरता जाणवणारी लोकेशन्स,
महालाचे सेट, उडणारे देव, सफेद ढगातील स्वर्ग, काळ्या अंधारातील पाताळ, खोट्या
दाढ्या लावलेले ऋषीमुनी, काळेकुट्ट, गडगडाटी हसण्याचा प्रयत्न करणारे व डोक्यावर
शिंग लावून भयाण दाखवायचा प्रयत्न केलेले राक्षस हे बघून हसायलाच जास्त येते.
पण ‘कहानी महादेव की’ मालिकेचे सुरुवात व्हायच्या आधीचे
जे प्रोमो दाखवले गेले व त्यातून महादेव बनलेल्या नायकाचा चेहरा न दाखवता फक्त
त्याच्या बांधेसूद शरीरावर फोकस करून महादेवचे दाखवले गेलेले फोटो, रुद्राक्ष,
त्रिशूल ह्यांचा केलेला वापर, हिमालयातील दाखवलेले सौंदर्य ह्या वरूनच जाणवायला
लागले होते की ही मालिका नक्कीच इतर पौराणिक मालिकांपेक्षा वेगळी आहे पण प्रत्यक्ष
मालिका सुरु होऊन तिचे चार/ पाच भाग बघितल्याशिवाय ही मालिका पुढे पहायचे की नाही
ते ठरवणार होतो. जेव्हा मालिका चालू झाली आणि महादेव बनलेल्या नायकाचे दर्शन
(टीव्हीवर) झाले तेव्हा जरा वेगळेच वाटले. वर्षोनुवर्षे आपल्या लाडक्या देवांच्या
ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी पाहून मनात त्यांच्याबद्दल एक प्रतिमा तयार झालेली
असते तिच्यापेक्षा जरा चेहरा वेगळा होता. बाकी शरीरसौष्ठव मनातल्या प्रतिमेशी अगदी
जुळत होते. सती बद्दल वाचन कमी होते त्यामुळे तिची मनातली प्रतिमा थोडी धुसर होती
त्यामुळे ह्या मालिकेत दाखवली गेलेली सती जरी मनाला भावली नसली तरी महादेवाच्या
पुढे ती चालून जात होती.
महादेवाच्या भूमिके नंतर सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे
मागे उभारले जाणारे लोकेशन्स, सेट ज्याच्यामुळे त्या काळाचा भास झाला पाहिजे, एक
भावनात्मक फील आला पाहिजे आणि ह्या मालिकेच्या क्रियेटीव्ह निर्मात्याचे खरच कौतुक
केले पाहिजे. त्याने सर्व जुन्या कन्सेप्ट, जुन्या कल्पना मोडून काढत, खरचं नवीन
कल्पनाशक्ती लावून भन्नाट सेट उभारले आहेत. ते बघूनच ठरवले की ह्या मालिकेत नक्कीच
चांगले बघायला मिळणार आहे आणि ही मालिका न चुकवता नक्की बघायची.
महादेव बनलेला नायक सुरुवातीला जरी थोडा कल्पनेपेक्षा वेगळा
वाटला होता तरी आता एवढे भाग बघून असेल कदाचित आणि त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे
तो महादेवाच्या प्रतिमेला साजेसा वाटायला लागला आहे. महादेव म्हटले की भोळासांब पण
तेवढाच हुशार आणि ज्ञानी, विश्वातील सर्व गोष्टींचे ज्ञान असून ही गर्वाचा लवलेश
नसलेला, भयंकर रागीट पण तेव्हढाच प्रेमळ आणि भावनिक, चेहऱ्यावर व हालचालीमध्ये
असलेला शांत,तृप्त भाव....कुठे घाई नाही की गडबड नाही, अंगाला भस्म फासलेला, नेहमी
ताठ बसून शांत ध्यान करत बसलेला, भक्तांचे हरतऱ्हेचे लाड पुरविणारा, सतीच्या
मृत्युनंतर व्याकुळ होऊन रागाने तांडव नृत्य करणारा ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर
येतात. महादेव बनलेल्या नायकाने ह्या सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली आहे,
त्याच्या अभिनय कुठेही खोटा वाटत नाही किंवा अविवेकी वाटत नाही, चेहऱ्याचे हावभाव
आणि शरीराची हालचाल अगदी शांतपणे साकारली आहे, सतीच्या मृत्युनंतर त्याने व्यक्त केलेला
राग, विषाद अगदी स्तुत्य होता. त्यात कुठेही ओव्हर अक्टिंग वाटली नाही आणि त्याच
वेळी दक्षाला मारताना रागावलेले, भडकले महादेव पण त्याने त्याच ताकदीने साकारला
होता. त्याची धावण्याची,रागावण्याची, त्रिशूल फेकण्याची, ज्ञान देण्याची,
समजावण्याची, ध्यानस्त बसण्याची, चेहऱ्यावर गुढ हसण्याची अभिनय क्षमता खरच
वाखाणण्यासारखी आहे. कदाचित त्याच्या एवढा न्याय त्या भूमिकेला क्वचितच दुसरा कोणी
देऊ शकला असता.
मलिकचे निर्माता आणि दिग्दर्शक ह्यांनी निवड केलेले सर्व
पात्र एखाद दुसरा अपवाद वगळता आपापल्या भूमिकेला अगदी परिपूर्ण आहेत. बी. आर.
चोप्रांच्या महाभारत मालिके नंतर योग्य पात्र निवड कदाचीत ह्याच मालिकेची असेल. एक
सती आणि नंदीचे पात्र जरा भूमिकेत वेगळे वाटते. दोघांचे अभिनय चांगले आहेत. पण
कदाचित त्यांना जास्त रडण्याचे डायलॉग दिले गेले असल्यामुळे दोघे जरा रडके वाटले
आणि नंदी म्हणजे जाड्या, ढेरपोट्या, थोडासा सावळा अशी आपल्या मनातील प्रतिमा
असल्यामुळे कदाचित मजबूत शरीरयष्टीचा आणि सपाट पोट असलेला नंदी पचवायला थोडा अवघड
गेला. बाकी दक्ष (महाभारतातील द्रोणाचार्य), पार्वती, ब्रह्मा, विष्णू, सप्तर्षी,
चंद्र, गंगा, अगदी तारकासुर, शुक्राचार्य हे सुद्धा आपल्या भूमिकेत चपखल बसले
आहेत. सर्वानी सहज सुंदर अभिनय पण केला आहे. खास करून असुर जमातीतील लोक हे शिंग
असलेले, भयानक चेहऱ्याचे दाखवले नाही आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरून व अभिनयातून ते
नक्कीच दुष्ट मनाचे आहेत हे दिसून येते.
ह्या मालिकेचे ड्रेस डिझायनर, मेक-अप आर्टिस्ट ह्यांचे पण
कौतुक करण्यासारखे आहे. महादेव, सती, पार्वती, नंदी, दक्ष, सप्तर्षी तसेच राजघराण्यातील
स्त्रिया व पुरुष ह्यांची वेशभूषा व रंगसंगती खरच वाखाणण्यासारखी आहे. कुठल्याही
ऋषी-मुनींची दाढी खोटी लावलेली वाटत नाही अगदी दक्षाची वेणी बांधलेली शेंडी
सुद्धा, प्रत्येकाच्या भूमिकेला साजेसा असा मेक-अप केलेला आहे. त्यात कुठेही
भडकपणा वाटला नाही.
हिमालयातील लोकेशन्स, राजमहालाचे भव्य सेट, महादेवाचा कैलाश
पर्वतावरील सेट हे अप्रतिम आहेत. ते सेट आहेत हे माहित असून सुद्धा कुठेही कृत्रीम
पण वाटत नाही. कैलाशावरील महादेवाची बसायची जागा आणि तेथील वनसंपदा तर अप्रतिमचं.
तसेच दक्षाचा महाल, पार्वतीचा महाल हे अतिशय सुंदररीत्या उभारले आहेत. नेहमीपेक्षा
नक्कीच वेगळे, महादेवाच्या लग्नाच्या वेळी दाखवलेले लाखो उपस्थित हे ग्राफिक्स
वापरून दाखवले होते हे समजत होते पण त्यात चुका कुठेच आढळत नव्हती, तसेच महादेवाचा
रुद्रावतार दाखवते वेळी व महादेव की बारात वेळी वापरले गेलेले ग्राफिक्स पण
अप्रतिम होते. आता तर
पार्वतीचा महाकालीचा अवतारचे प्रोमोज दाखवायला सुरुवात झाली आहे. खरचं चलचित्रण
आणि क्रिएअतिव्हिति खरच खूप छान आहे.
अजून खूप काही नवीन बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघू पुढे
काय चमत्कार करताहेत महादेव.
हर हर महादेव !!!
देवों के देव महादेव
कथा – मिहित भुतिया,ब्रिज मोहन पांडेय, सुब्रत सिंह.
दिग्दर्शक – निखिल सिंह व मनिष सिंग
कलात्मक दिग्दर्शक- अनिरुद्ध पाठक
सिनेमाटोग्राफी- दीपक गर्ग
महादेव बनलेला कलाकार – मोहित रैना
CONVERSATION
Ganapati Bappa
CONVERSATION
मनाचा मेगाब्लॉक
गेले काही दिवस खूप रिकामे रिकामे झाल्यासारखे वाटत होते. नवीन ज्ञानात काही भरच पडत नव्हती. मेंदूला काही नवीन खुराकच नव्हता मिळत. ऑफिस मध्ये कामाचा रगाडा एवढा वाढला होता की मेंदू दुसरा काही विचार करायला ऐकतच नव्हता. नवीन क्रिएटीव्हीटी (creativity) जन्मतच नव्हती. ब्लॉग लिहायला विषय तर भरपूर होते. पण शब्द सुचत नव्हते. ब्लॉगर मध्ये लॉगिन करून अर्धा अर्धा तास बसून राहायचो. कितीतरी पोस्ट अश्या अर्ध्याच ड्राफ्ट मध्ये पडून आहेत. काही तयार पण आहेत....पण पोस्ट कराव्याश्या वाटत नाही आहेत. अगदी पहिली इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने निबंध लिहावे तश्या झाल्या आहेत...स्वत:लाच वाचून मानसिक समाधान नाही मिळत तर त्या पब्लिश कश्या करणार ?
काहीतरी कमी होत चाललेय...पण काय ते समजत नव्हते. मी काही एवढा मोठा लेखक नाही की माझ्या प्रतिभेला गंज चढतोय असे म्हणायला...पण जे काही शुद्ध बोलतोय, विचार करतोय, ते लिहिता येत नव्हते....जे तरंग मनपटलावर उमटत होते तसे प्रत्यक्ष्यात उतरत नव्हते. अगदीच कृत्रिम वाटत होते. पण असे का होतेय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. कदाचित उत्तर शोधायला पण मेंदूला वेळ आणि निवांतपणा मिळत नव्हता.
मग एका रविवारी अंघोळ करताना असा निवांत वेळ मिळाला. सहसा अंघोळ करताना माझे मन खूप रिकामे असते. अंघोळीचे ७ ते १० मिनिटे मी कसलाच विचार करत नाही. स्वत:चा, घरच्यांचा, ऑफिसचा, पैशांचा , भविष्याचा, अगदी कसलाच नाही. त्या वेळात मी कसला विचार करतो तेच मला नंतर आठवत नाही....त्याचाच अर्थ म्हणजे तेवढ्या वेळापुरते मन नक्कीच रिकामे होत असावे. नुसती शरीराची नाही तर मनाची पण अंघोळ होत असते आणि ही सवय बहुदा अक्कल येण्याआधीपासून आहे...अगदी शाळेत असल्यापासून. त्यामुळे अंघोळ केल्यावर मानसिक आराम नक्कीच खूप मिळतो आणि रविवारी कामावर जायची घाई नसल्याने अंघोळ निवांत चालते.
तर अश्या एका रविवारी अंघोळ करून अंग पुसताना अचानक 'दिमाग की बत्ती जली'....हे जे काही मनात उलथापालथ चालली आहे.....जे मानसिक समाधान मला मिळत नाही आहे ते मराठी भाषेमुळे मिळत नाही आहे. गेले काही महिने मराठी भाषेत संवादच होत नाही आहे, भाषा ही मनातल्या भावना प्रस्तुत करायचे सर्वात चांगले माध्यम असते. मनातल्या विविध भावनांना आपली भाषाच....खास करून मातृभाषाच.....शब्दरूप देते. भावनांचे अस्तित्व शब्दामुळे जास्त चांगले प्रकट होते....ह्या भाषेलाच कुठे तरी मेगा ब्लॉक लागला आहे. त्यामुळे भावनांचा, मनातल्या विचारांचा निचरा होत नाही आहे. सर्व तुंबून राहिले आहे.
असं का? आजार समजल्यावर आपोआप मनाने आजाराचे कारण आणि त्यावर औषध शोधायला सुरुवात केली. गेले काही महिने ऑफिस मध्ये प्रचंड काम वाढले होते. ऑफिस मध्ये ९० टक्के हून जास्त संवाद, लिहिणे, बोलणे, इमेल्स पाठवणे, ऑफिस नोट्स लिहिणे, टेंडर काढणे हे सर्व इंग्लिश मधूनच होत होते. उरलेल्या १० टक्क्यामध्ये ८ टक्के हिंदी असायचे आणि मराठीच्या वाट्याला फक्त २ टक्केच येत होते. गेले वर्षभर महाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्र आणि काही निवडक मराठी ब्लॉग वगळता मराठीतून काही वाचन झालेच नाही. शेवटचे पुस्तक किंवा कादंबरी वाचून कमीत कमी दोन वर्षे तरी झाली असतील. कोणती वाचली ते पण आठवत नाही. घरात मराठीच बोलत होतो पण ते सुद्धा माहित असलेले मराठी. नवीन शब्दांची, वाक्यांची भरच पडत नव्हती. काही प्रतिभावान लेखकांचे मराठी ब्लॉग वाचनात येत होते. पण त्याने भूक भागत नव्हती. मित्र परिवार तर मराठीएतर जास्त आहे. त्यामुळे भाषेला म्हणावे तसे पॉलिश होत नव्हते.
मग त्यावर उपाय काय? मराठीचे वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. त्या साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपली मराठी साहित्यसंपदा. मराठी साहित्यात अशी अनोखी ताकत आहे की ती ह्या आजारपणाला पळवून लावेल. पण मग मराठी साहित्य आणायचे कुठून..विकत घ्यायची तर सध्या ऐपत नाही आणि घरात तेव्हढी जागाही नाही. मग लायब्ररी चालू करायला पाहिजे. राहत्या घराच्या जवळपास एकहि चांगली लायब्ररी नाही. एक होती तिच्या मालकिणीने दोन वर्षापूर्वीच बंद केली अगदी डिपॉजिट पण परत नाही केले. पुस्तक वाचून परत करायला गेलो तर तिथे मोबाईलचे दुकान! 'इधर लायब्ररी था ना ...कहां गया?' मी भोळेपणाने त्याला विचारले तर अगदी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे बघावे तसे तुच्छ कटाक्ष टाकून तो बोलला, 'वो तो उसके मॅडम ने बंद कर दिया, अभी हमारा दुकान है!' आणि अशी काही नजर दिली की त्याच्या म्हणण्याचा उद्देश्य होता की हे आता मोबाईलचे दुकान आहे आणि परत इथे लायब्ररी बद्दल विचारायला येऊ नकोस...चालता हो.'
ठाण्यात तश्या लायब्ररी आहेत पण जवळपास नाही. स्टेशन जवळ 'माझे ग्रंथ भांडार' म्हणून मोठी लायब्ररी आहे तीच चालू करायचा विचार करत होतो. फक्त येण्याजाण्याचा त्रास होणार होता. पण मनाने नक्की केले होते की वेळ नाही भेटला तरी चालेल पण लायब्ररी नक्की चालू करायची.
ठाण्यात तश्या लायब्ररी आहेत पण जवळपास नाही. स्टेशन जवळ 'माझे ग्रंथ भांडार' म्हणून मोठी लायब्ररी आहे तीच चालू करायचा विचार करत होतो. फक्त येण्याजाण्याचा त्रास होणार होता. पण मनाने नक्की केले होते की वेळ नाही भेटला तरी चालेल पण लायब्ररी नक्की चालू करायची.
'अरे तुला झोप पूर्ण करायला तरी वेळ मिळतोय का? लायब्ररी चालू करून पुस्तके कधी वाचणार? कशाला उगाच पैसे फुकट घालावतोयस?'....बायकोचा प्रश्न!!!
'तिला म्हटले काहीही होऊ देत...भले वर्षाला एक पुस्तक वाचून झाले तरी चालेल पण आता लायब्ररी चालू करणारच. पैसे गेले तरी चालतील.'
'पैसे काय झाडाला लागलेत तुझे?' बायकोचा प्रतिप्रश्न
'अगं ! लोकांना दारू, गुटखा, सिगारेट ची सवय असते. पगारातला दहा टक्के भाग ते ह्या व्यसनात उडवतात. मला तर ह्यापैकी काहीच व्यसन नाही. वाचनाचे एक व्यसन होते ते पण खूप दिवस झाले सुटले आहे. असे समज पैसे तिकडेच खर्च झाले.'
'ठीक आहे तुझी मर्जी !!' .....बायको शांत (कदाचित पहिल्यांदा)
दुसऱ्याच दिवशी ऑफिस मधून परत येताना पहिल्या मजल्यावरच्या काकूंकडे एक माणूस पुस्तक घेऊन आला होता. काकूंकडे विचारले तर त्या म्हणाल्या, 'अरे! ही नवीन लायब्ररी चालू झाली आहे. ते आपण फोनवर सांगितलेले पुस्तक घरपोच आणून देतात.' त्या माणसाला मी त्याचा मोबाईल नंबर विचारला तर त्याने त्यांच्या लायब्ररीचे जाहिरातीचे पत्रकच हातात दिले व म्हणाला ह्या नंबर वर फोन करून बोलून घ्या.
योगायोग असा की मी लायब्ररी चालू करण्याचा विचारच करत होतो व कुठली लायब्ररी लावायची हेच शोधत होतो आणि नेमकी लायब्ररीच माझ्या समोर चालून आली होती. म्हटले हा नशिबाचाच कौल आहे लवकरात लवकर चालू केली पाहिजे.
ते पत्रक घेऊन घरी आलो आणि त्याला फोन लावला. दोनशे रुपये महिना फी, दोनशे रुपये डिपॉजिट आणि दोनशे रुपये सभासद वर्गणी असे करून पहिल्या महिन्याचे सहाशे रुपये नंतर प्रत्येक महिन्याचे दोनशे रुपये असे त्याने सांगितले. म्हटले उद्या येऊन पैसे घेऊन जा आणि चांगले पुस्तक देऊन जा. दुसऱ्या दिवशी तो येऊन पैसे घेऊन गेला आणि पुस्तकांची लिस्ट घेऊन गेला. त्याला फक्त लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव सांगायाचे त्या दिवशी संध्याकाळी तो ते पुस्तक घेऊन येणार.
काही दिवसा पूर्वी नेट वर 'मेलुहाचे मृत्युंजय' ह्या पुस्तकाबद्दल खूप चर्चा वाचली होती. तेच पुस्तक मागवून घेतले आणि नेमके ते पुस्तक त्यांनी दोन दिवसापूर्वी नवीन खरेदी केले होते. मीच त्याचा पहिला वाचक झालो. जवळपास ४८५ पानांपैकी सव्वा दोनशे पाने वाचून ही झालीत.
आता कुठे जरा मनाचा मेगाब्लॉक सुटेल आणि साचलेल्या निरुपयोगी विचारांचा निचरा होईल अशी अशा करतोय. देखेंगे आगे आगे होता है क्या???
योगायोग असा की मी लायब्ररी चालू करण्याचा विचारच करत होतो व कुठली लायब्ररी लावायची हेच शोधत होतो आणि नेमकी लायब्ररीच माझ्या समोर चालून आली होती. म्हटले हा नशिबाचाच कौल आहे लवकरात लवकर चालू केली पाहिजे.
ते पत्रक घेऊन घरी आलो आणि त्याला फोन लावला. दोनशे रुपये महिना फी, दोनशे रुपये डिपॉजिट आणि दोनशे रुपये सभासद वर्गणी असे करून पहिल्या महिन्याचे सहाशे रुपये नंतर प्रत्येक महिन्याचे दोनशे रुपये असे त्याने सांगितले. म्हटले उद्या येऊन पैसे घेऊन जा आणि चांगले पुस्तक देऊन जा. दुसऱ्या दिवशी तो येऊन पैसे घेऊन गेला आणि पुस्तकांची लिस्ट घेऊन गेला. त्याला फक्त लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव सांगायाचे त्या दिवशी संध्याकाळी तो ते पुस्तक घेऊन येणार.
काही दिवसा पूर्वी नेट वर 'मेलुहाचे मृत्युंजय' ह्या पुस्तकाबद्दल खूप चर्चा वाचली होती. तेच पुस्तक मागवून घेतले आणि नेमके ते पुस्तक त्यांनी दोन दिवसापूर्वी नवीन खरेदी केले होते. मीच त्याचा पहिला वाचक झालो. जवळपास ४८५ पानांपैकी सव्वा दोनशे पाने वाचून ही झालीत.
आता कुठे जरा मनाचा मेगाब्लॉक सुटेल आणि साचलेल्या निरुपयोगी विचारांचा निचरा होईल अशी अशा करतोय. देखेंगे आगे आगे होता है क्या???
CONVERSATION
असं का ? आणि रसग्रहण
क्रित्येकदा मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. काही प्रश्न सहज सोपे असतात. तर काही कठीण असतात. काही प्रश्नाची उत्तरे माहित असून सुद्धा ते प्रश्न म्हणूनच राहतात. तर काहींची उत्तरेच सापडत नाहीत. काही प्रश्न सोडवल्यावर त्यांची उत्तरे सापडतात. तर काही प्रश्न सोडवत जाताना त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उभे राहतात. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आनंद मिळतो तर काही प्रश्नांची उत्तरे सोडवताना मनाला क्लेश होत राहतात. काहींची उत्तरे चुटकीसरशी मिळतात. तर काहींची उत्तरे शोधत अख्खे आयुष्य घालवावे लागते. काही प्रश्न आयुष्यातल्या चांगल्या आठवणी डोळ्यासमोर आणतात तर काही प्रश्न आयुष्यातल्या दु:खद प्रसंगांची आठवण करून देतात. काही प्रश्नांची उत्तरे माहित असतात पण त्याने मानसिक समाधान होत नाही तर काहींची उत्तरे माहित नसल्यामुळेच मानसिक समाधान मिळते. मी तर कधी कधी तर उत्तर मिळवण्याच्या नादात प्रश्न काय असतो तेच विसरून जातो.
असे अनेक बरे वाईट प्रश्न मनाच्या पातळीवर चांगल्या आणि वाईट मनाशी युद्ध
करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहींची उत्तरे मिळतात. तर काही अनुत्तरीतच
राहतात. असाच एकदा विचार करत असताना परत एक प्रश्न मनात उभा राहिला (पुनः प्रश्न).
अश्या अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणारच नाहीत का? असे प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडत असतील. काहींनी त्यावर
उत्तरे शोधायचा प्रयत्नही केला असेल तर काहींनी उत्तरे मिळवली सुद्धा असतील. मग
विचार केला असे मनात उद्भवणारे प्रश्न ब्लॉगवरच का टाकू नये. कदाचित समविचारी कोणी
असेल तर त्यांची उत्तरे तर मिळतील. काहींची उत्तरे शोधण्यात मदत तरी होईल.
म्हणूनच ब्लॉग वर एक नवीन सदर चालू करायचा विचार केला "असं का?". ह्या अनुषंगाने मनात येणारे सगळे प्रश्न निदान लिहून तरी ठेवता
येतील. इतरांकडून उत्तरे मिळो अथवा न मिळो. कधीतरी आयुष्याच्या संध्याकाळी निवांत
बसून परत तेच प्रश्न वाचून त्यांची उत्तरे भेटली कि नाही हे तर बघता येईल.
त्याबरोबर अजून एक सदर चालू करायचा विचार आहे. "रसग्रहण"
ह्यात ज्या ज्या गोष्टी आवडतात, नावाडतात, मनाला भावतात किंवा भयंकर डोक्यात जातात. त्या सर्वांचे रसग्रहण
करायचा विचार आहे. ह्यात खाद्य पदार्थ, एखादे हॉटेल, एखादा कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळ, चित्रपट, नट नटी, पुस्तके, खेळाडू इ. कश्या कश्यावरही विवेचन करायचे आहे. मराठी माणसाचा
गुणधर्मच आहे ना! नाही म्हटले तरी आपले मत मांडणारच. 'रसग्रहण' ह्या सदरा खाली हेच विवेचन करायचे आहे.
CONVERSATION
एक अविस्मरणीय अनुभव !!
भिंगरीला तसेच हॉस्पिटलमधून घरी आणले होते. तिच्यावर काही उपचार करताच आले नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला आता बाळ झाल्यावरच उपाय करता येणार होते. नुसतेच हॉस्पिटलमध्ये ठेवून काय करणार म्हणून तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यादिवशी दसरा होता. मराठी तिथीनुसार तिचा वाढदिवस. तिला घरी आणले. केक वगैरे कापून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केले. पण दुखण्यामुळे ती बेजार झाली होती.
(ही ब्लॉग पोस्ट समजण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी ह्या पोस्ट मागची इथे पार्श्वभूमी जरूर वाचा. तर ह्या पोस्टचा आस्वाद माझ्या जोडीने घेता येईल.)
तिला घरी आणले तेव्हा ऑक्टोबरची सहा तारीख होती व आताशी तिला सातवा महिना चालू होता. तिची डिलीव्हरीची तारीख अंदाजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तिला कमीत कमी तीन महिने उपचार न करता राहावे लागणार होते. हे पुढील तीन महिने खूप कष्टदायक जाणारे होते. पोटात बाळ असल्याने ह्या काळात तिला खूप खायची इच्छा होत होती तिची भूक वाढत होती. पोटातल्या बाळाचीही भूक वाढत होती. पण तिच्या जबड्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे आणि पूर्ण दात व हिरड्यांना तारा व धातूचे चाप (clip) लावल्यामुळे तिला काही खाताच येणार नव्हते. कमीत कमी दोन महिने तिला जल पदार्थ आणि सूप खाऊनच राहावे लागणार होते.
तिचे आणि पोटातल्या बाळाचे हाल बघवत नव्हते. पण तिच्या हातातही काही नव्हते अन आमच्या हातात ही काही नव्हते. जे घडतेय ते फक्त बघत राहणे हाच पर्याय समोर होता. ह्या काळात तिचे मन खूप उदास राहायचे दुखण्यामुळे सारखी रडत राहायची. समजूत काढून तरी किती काढणार? तुझ्या रडण्याने पोटातील बाळावर वाईट परिणाम होतील एवढेच सांगून तिला शांत करता यायचे. होणाऱ्या बाळासाठी ती त्रास सहन करून गप्प राहायची.
पुढच्या तीन महिन्यात चार पाच वेळा तिला लीलावती हॉस्पिटल मधील तिच्या डॉक्टर कडे घेऊन जावे लागले. तिला झालेल्या अपघात आणि तिच्या वर झालेले ऑपरेशन तसेच तिच्या बरगड्यांना झालेले फ्रॅक्चर यामुळे तिला डिलीव्हरीच्या वेळेस होणाऱ्या कळा सहन होणाऱ्या नव्हत्या. प्रसव वेदना सहन करायची तिची मानसिक तयारीही नव्हती. तिचे फ्रॅक्चर बघून तिच्या प्रसुती तज्ञाने (Gynecologist)-डॉ. रंजना धानू-ह्यांनी तिचे इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करावे लागेल म्हणून सांगितले. डॉ. रंजना धानू ह्या लीलावती मधील नावाजलेली प्रसुतीतज्ञ आहेत. डॉ. रंजनाने आधीच सांगितले होते की तिने आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे. त्यात तिला प्रसव वेदना देण्यात अर्थ नाही. त्यामुळे तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. आपण तिची इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करूयात. त्याने तिला त्रास कमी होईल. शिवाय पोटावर टाकेसुद्धा दिसणार नाही. तिने असेही सुचवले की जर तुम्हाला ह्या हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसेल आणि तुम्हाला कुठे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जर तिची डिलीव्हरी करायची असेल तर कुठल्याही साध्या हॉस्पिटल मध्ये करू नका तिच्यासाठी मल्टी-स्पेशालिटी - सर्व साधनांनी युक्त असेच हॉस्पिटल निवडा.
कौटुंबिक निर्णयात असे ठरले की तिला आधीच खूप त्रास झालेला आहे त्यामुळे बजेट जरी हलले असले तरी तिच्यावर उपचार हे लीलावती हॉस्पिटल मध्येच करायचे. लीलावती मध्ये २० हजार रुपये जमा (deposit) करायला सांगितले गेले आणि उरलेले पैसे तिच्या ऍडमिशन च्या वेळेला भरायला सांगितले. आम्ही सर्वजण डिसेंबर महिना कधी संपतो ह्याची वाट बघायला लागलो होतो. जानेवारी मध्ये येणाऱ्या नवीन बाळाची आणि तिच्या सही सलामत सुटकेची सर्वाना ओढ लागली होती. डिसेंबरच्या १० तारखेला तिला चेकअप साठी बोलावले होते. तिची अंतर्गत सोनोग्राफी केली गेली. डॉक्टर रंजनाने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरशी फोनवर बोलून काही तरी बोलणी केली आणि नंतर आम्हाला सांगितले की तिची ह्या आठवड्यात सिजेरीअन करावे लागेल.
आम्ही आश्चर्यचकित होऊन विचारले की, 'आम्हाला तर जानेवारी महिन्याची सात तारीख दिली होती. मग एवढ्या लवकर का ?
डॉक्टर म्हणाले तिचे बाळाचे वजन डिलीवरी योग्य झाले आहे. बाळाने आपली दिशा बदलून डोके खाली केलेले आहे. तिला कधीही प्रसव वेदना चालू होऊ शकतील. रात्रीच्या वेळी अचानक प्रसव वेदना चालू झाल्या आणि जर तुम्हाला गाडी मिळाली तर तुम्ही तिला घरून हॉस्पिटल मध्ये आणेपर्यंत तिला खूप त्रास होऊ शकतो. दिवसा जर प्रसव वेदना चालू झाल्या तर ट्राफिक मधून येईपर्यंत तिला खूप त्रास होईल. तुम्ही पुढच्या आठवड्यातील एखादी तारीख ठरवा मला फोन वर कळवा आणि आदल्या दिवशी तिला हॉस्पिटल मध्ये भरती करा.
अचानक एवढे सांगितल्यामुळे भिंगरी जरा घाबरून गेली. तिच्या साठी २०११ हे वर्ष चांगले नव्हते गेले. तिचा एवढा मोठा अपघात झाला होता. तिच्या आणि बाळाच्या जीवावर बेतले होते. देवाच्या कृपेने दोघेही ठीक होते पण तिला ह्या वर्षात बाळ नको होते. नवीन वर्षात नवीन सुरुवात व्हावी असे वाटत होते. बाळाच्या दृष्टीने सुद्धा त्याचे शाळेत वय लागताना वर्ष २०११ लागणार होते त्यामुळे तिला ते नको होते. तिने डॉक्टरला विचारले सुद्धा की माझी डिलीव्हरी पुढच्या महिन्यात नाही होऊ शकत का? डॉक्टर ने तिला समजावले की ते किती धोकादायक आहे आणि ह्या महिन्यात आणि ह्या आठवड्यातच डिलीव्हरी करण्यास तिला मानसिक रित्या तयार केले.
आता आमच्या कडे एक सुवर्णसंधी चालून आली होती की आमच्या होणाऱ्या बाळाची जन्मतारीख आणि चांगला दिवसवार निवडायची. तो मार्गशीष महिना होता. घरातल्यांनी भटजीला विचारून ही घेतले की कुठला दिवस चांगला आहे. त्यांनी सांगितले मार्गशीष संपेपर्यंत सर्वच दिवस चांगले आहेत. नक्की काय करायचे ते सुचत नव्हते. नोव्हेंबर महिना असता तर ११-११-११ ही तारीख तरी निवडता आली असती. रविवार ते शनिवार कुठला दिवस घ्यावा हा प्रश्न होता. सोमवारी जन्मलेली मुले हट्टी असतात हा अनुभव होता. मंगळवार चांगला होता. त्यादिवशी १३ तारीख होती. जन्मतारीख पण १३-१२-११ आली असती. पण एका खास मित्राचा-जिगरचा जन्मदिवस पण १३ डिसेंबर होता. तो दिवस पण नको होता. बुधवारी १४ डिसेंबर होती. त्यादिवशी संकष्टी होती. गणपतीचा चांगला वार होता. खूप विचारांती तोच दिवस निश्चित केला. पण नेमकी त्या दिवशी डॉक्टरला दुसऱ्या दोन केसेस एक्स्पेक्टेड होत्या. त्यांच्या डिलीव्हरी जर नेमक्या त्या दिवशी आल्या असत्या तर हिची डिलीव्हरी पुढे ढकलावी लागली असती. तसेच डॉक्टर ने ऑपरेशन रूमची उपलब्धता, तिचा रक्तदाब आणि तिची मनाची तयारी ह्या गोष्टी ही महत्वाच्या असतील हे नमूद केले.
साशंक मनाने तिला मंगळवारी संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये भरती केले. बाजूच्या बेड वर एक मुसलमान स्त्री होती. तिचे तिसरे बाळ जन्मणार होते. तिला प्रसुती वेदना चालू झाल्या होत्या आणि ती भयंकर किंचाळत होती, रडत होती, नर्सेस, डॉक्टर कोणाचेच ऐकत नव्हती. जे हातात भेटेल ते फेकून देत होती. त्यामुळे भिंगरी अजूनच घाबरून गेली. रात्री पावणे एकच्या सुमारास बाजूच्या बाईला लेबर रूम (प्रसुती करण्याची खोली) मध्ये घेऊन गेली आणि तिच्या रूम मध्ये शांतता झाली. पण पुढील पंधरा मिनिटातच तिला बाळ झाले आणि तिला परत रूम मध्ये आणले गेले. ती बाई शांत झाली होती पण तिच्या बाळाने रडणे चालू केले होती. भिंगारीला रात्रभर झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन थियेटर उपलब्ध झाले होते. तिला सकाळीच बरोबर पावणे नऊला एक सलाईन लावून आणि एक इंजेक्शन देऊन आत मध्ये घेऊन गेले. ती जायच्या आधी पोटाला मिठी मारून घेतली कारण आता वर आलेले पोट दिसणार नव्हते...बाळ बाहेर येणार होता.
तिला स्ट्रेचर वर घेऊन जाण्यापूर्वी आम्ही दोघेही खूप खुश होतो पण जशी तिला लेबर रूम मध्ये घेऊन गेले तसे मन उदास झाले. मनात एक भीतीचे तरंग उठून गेले. ती पण रुममध्ये आत जाईपर्यंत हात घट्ट पकडून होती. जाताना पण तिच्या मनावरची भीती आणि डोळ्यातले पाणी स्पष्ट दिसत होते. तिचे ऑपरेशन यशस्वी होईल ना! बाळ चांगले असेल ना ! अपघाताचे आणि उपचारांचे काही परिणाम तर नसतील ना झाले त्या बाळावर ? खूप शंका मनात डोकावत होत्या आणि मन उगाच कासावीस होत होते. धमण्यातील रक्त जोरात पळू लागल्याचे जाणवू लागले होते. अंगावर काटे उभे राहत होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती त्यांच्या ठोक्याच्या आवाज स्वत:च्या कानांना जाणवू लागला होता. आजूबाजूचे जग विसरून गेल्यासारखे झाले होते. समोर धावपळ करणारे नर्सेस, डॉक्टर दिसत होत्या पण मनापर्यंत पोहचत नव्हत्या. एक वेगळीच समाधी लागत होती. मनातले सगळे वाईट विचार बाजूला केले आणि लेबर रुमच्या बाहेर उभे राहून बाप बनण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. मुलगा होणार की मुलगी? दोघांसाठी नावे ठरवून ठेवली होती. कोणीही झाले असते तर आनंदच होणार होता. भिंगरीला मुलगा हवा होता. तिने देवाला त्या साठी खूप मस्के मारले होते. मला कोणीही चालले असते. फक्त बाप बनण्याचा आनंद उपभोगायचा होता. बस्स!!! स्व:ताच्या रक्तामांसाच्या गोळ्याला मिठीत घ्यायचे होते. जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी धडधड अजून वाढत होती.
डॉ रंजनाला मदत करायला अजून एक डॉक्टर येणार होता. त्याला दुसऱ्या पेशंटची इमर्जन्सी आल्याने यायला एक तास उशीर लागला. सव्वा दहा वाजता तो डॉक्टर आला. तोपर्यंत जीव कासावीस व्हायला लागला होता. कधी एकदा ऑपरेशन होते आणि बाळाची व बायकोची सुटका होतेय असे झाले होते. मागच्या भेटीत तिने डॉ. रंजनाला विचारले होते की ऑपरेशन च्या वेळेस माझ्या नवऱ्याला सोबत घ्याल का? तिने त्या वेळेस बघू असे सांगून उत्तर द्यायचे टाळले होते. आज ती यायच्या आधी तेथे असलेल्या डॉक्टरांना तिने मलाही ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी हट्ट केला होता. पण डॉक्टरांनी तिला नाही म्हणून सांगितले. साडे दहा वाजता डॉ रंजना आल्या. ऑपरेशन थियेटर मध्ये जाण्याआधी त्यांनी मला भेटून काही घाबरायची गरज नाही सर्व ठीक होईल म्हणून सांगितले. मी त्यांना बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवायला सांगितली त्यांनी 'हो नक्कीच!' असे म्हणून ऑपरेशन थियेटर मध्ये निघून गेल्या. त्या तश्याच उलट पावली बाहेर आल्या नी म्हणाल्या, तुम्हाला ही यायचे आहे का ? बाळाचा जन्म बघायला.?
मला हे अनपेक्षितच होते. काय बोलायचे सुचलेच नाही. मी म्हटले, 'मी आलो तर चालेल का?'
डॉक्टर म्हणाल्या, 'ते मी बघेन, पण तुम्हाला रक्त वगैरे बघून किंवा वासाने चक्कर वगैरे येणार नाही ना!'
मी म्हटले,' माहित नाही, आधी कधी असे झाले नाही'
(तसे मागे काही वर्षापूर्वी एकदा रक्त तपासायला गेलो होतो तेव्हा सुईने रक्त काढून घेतल्यावर रक्त बाहेर आले होते. ते बघून चक्कर आली होती.डॉक्टर ने काही तरी प्यायला दिले होते म्हणून चक्कर येऊन पडलो नाही)
डॉक्टर म्हणाल्या, 'मग तुम्ही आत या.'
मी माझ्या सोबत असलेल्या कुटुंबियांना सांगून आत गेलो. तिथे असलेल्या नर्सने परत बाहेर हाकलले व म्हणाली तुम्ही आत कसे आलात. आत मध्ये यायला परवानगी नाही. मी म्हणालो, 'मला डॉ रंजनाने यायला सांगितले आहे'. ती म्हणाली,'असे तुम्ही येऊ शकत नाही.तुम्ही बाहेर थांबा. मी विचारून सांगते.
मी काय करणार बाहेर येऊन थांबलो.
अर्ध्या तासाने त्याच नर्सने आतमध्ये यायला सांगितले. म्हणाली तुम्हाला डॉ. रंजना आतमध्ये बोलवत आहे. मी तिच्याकडे थोडे रागाने बघून बोललो. 'मग तुम्हाला आधीच सांगितले होते.....तुम्ही शहाणपणा करत होतात.' अर्थात हे सगळे मनातच बोललो. चेहऱ्यावर खोटे हास्य आणून तिला धन्यवाद म्हणालो. ती म्हणाली तुमचे मोबाईल, घड्याळ, पर्स सगळे बाहेर ठेवून या. परत बाहेर येऊन सगळे काढून ठेवून आत गेलो. मला तिने अंगावरचे सगळे कपडे काढून डॉक्टर वापरतात ते कपडे घालायला सांगितले. तोंडाला लावायला आणि केसांना घालायला मास्क दिला. मी तिची परवानगी घेऊन घड्याळ घालूनच ठेवले. बाळाचा जन्मवेळ बघायचा होता.
तिने मला विचारले, 'रक्त बघून चक्कर नाही ना येणार.? मी मानेनेच नाही बोललो.
कपडे घालून झाल्यावर ती ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन गेली. जवळपास आठ ते नऊ डॉक्टर घाई गडबडीत आपापले काम करण्यात गुंग होते. भिंगरीला अनेस्थेशिया दिला होता. त्यामुळे पोटापासून पायापर्यंत सर्व भाग बधीर झाला होता. पण ती बेशुद्ध नव्हती. तिचा आणि तिच्या बाळाचा आंतरिक संपर्क तुटू नये म्हणून तिला पूर्ण बेशुद्ध केले नव्हते. तिच्या पोटावर लग्नात एक अंतरपाट धरतात तसा हिरवा जाड फडका किंवा चादर धरली होती. त्यामुळे तिला आपल्या पोटावर काय करतात ते दिसत नव्हते. तिला अनेस्थेशिया देणारी डॉक्टर तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस उभी होती. तिथेच एक छोटे लोखंडी टेबल ठेवले होते व तिने मला खुणेनेच बसायला सांगितले.
त्या अनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टर ने मला परत विचारले, 'ठीक आहे ना !! चक्कर नाही ना येत आहे.
मी तसे अजून काही बघितलेच नव्हते. त्या हिरव्या कपड्या मागे काय चाललेय ते अजून दिसत नव्हते त्यामुळे मी सांगितले, 'मी ठीक आहे.'
मला आत आलेले बघून भिंगरी खुश झाली आणि तिचा चेहरा हसरा झाला. ते बघून सगळे डॉक्टर तिला चिडवायला लागले, हम्म नवऱ्याला बघून बघा आता कशी खुश झालीय. इंजेक्शन देताना कशी रडायला आली होती.' हे सगळे तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी होते ते समजत होते. पण ती खुश झाल्यामुळे बहुतेक रक्त दाब नॉर्मल झाला. तिला ऑपरेशनला घेतल्यावर बहुतेक तिने डॉ रंजनाला परत माझ्याबद्दल विचारणा केली असल्यामुळे मला अर्ध्या तासाने परत बोलावले गेले होते.
मी जाईपर्यंत डॉक्टरने तिच्या पोटावर काप मारून गर्भ पिशवी मोकळी करायला सुरुवात केली होती. मी गेल्यावर पाचच मिनिटात तिने इतर डॉक्टरांना विचारले, 'Now, are you ready?' (तुम्ही बाळाला बाहेर काढायला तयार आहात का?) सर्व डॉक्टरांनी हो म्हटल्यावर सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. भिंगरीचे अंग जोरजोरात हलु लागले. तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस असणारया डॉक्टरने एक... दोन ....तीन करत तिच्या छातीपासून पोटाकडे खालच्या बाजूला धक्का द्यायला सुरुवात केली. धक्का देता देता तिने मला विचारले तुम्हाला बघायचे आहे का बाळाला बाहेर येताना?? पण चक्कर येणार नसेल तर.?
('हा प्रश्न ऐकूनच मला चक्कर येणार आहे बहुतेकच' अर्थातच मनातल्या मनात पुटपुटलो.)
'हो मला बघायला आवडेल. ती म्हणाली ठीक आहे तुम्ही उभे राहा. पण जर चक्कर सारखे काही वाटले तर सरळ बाहेर जाऊन बेड वर झोपून घ्यायचे.' मी म्हटले, 'ठीक आहे.'
मी उठलो, एसी मध्ये असून सुद्धा घाम फुटायला लागला होता. मी बाप होणार होतो. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण बघणार होतो. काय असेल मुलगा की मुलगी.??? थरथरत्या हाताने पडदा थोडा खाली करून बघितले. तिच्या अंगावर सफेद चादर होती. आणि पोट पूर्ण उघडे होते. पोटावर बेंबीच्या खूप खाली आडवा काप मारला होता. पोटाला आणि अंगावरच्या चादरीला खूप रक्त लागले होते. सर्व डॉक्टरांचे हॅँडग्लोवज रक्ताने माखले होये. मन घट्ट केले. तिचा हात घट्ट पकडला. डॉ रंजनाने आवाज दिला. चलो रेडी!!!. तिने पोटावरचा काप अजून फाकवून बाळाचे डोके बाहेर काढायला सुरुवात केली. रक्तात पूर्णपणे माखलेल्या बाळाचे डोके तिने दोन्ही हातात धरून हळू हळू बाहेर काढले आणि थोडा वेळ थांबली. गर्भापिशवीत असलेल्या पाण्यामुळे बाळ पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. त्याला बाहेर काढल्यावर अंगावरचे पाणी लगेच सुकून गेले आणि रक्ताच्या छोट्या छोट्या गाठी डोक्यावर, कुरळ्या केसांवर राहिल्या. मग बाजूच्या सर्व लेडीज डॉक्टरांनी तिच्या पोटाला सगळीकडून दाबायला सुरुवात केली. त्या बाळाला बाहेर यायला मदत करत होत्या. डॉ रंजनाने बाळाचे डोके दोन्ही हातात घट्ट पकडले आणि त्याला हळू हळू बाहेर खेचायला सुरुवात केली. बाळाचे खांदे बाहेर आले. पाठ दिसू लागली.
त्याचे लाल रक्तात माखलेले अंग बाहेर येत होते आणि बाहेरच्या हवेवर ते सगळे सुखून बाळाचे अंग पांढरे फिक्कट पडत होते. पाठ बऱ्यापैकी बाहेर आल्यावर बाळाने पहिला ओंवा ओंवा चालू केले. त्याला पार्श्वभागावर फटके मारायचे गरजच नाही पडली. (वाचला बिचारा डॉक्टर नाहीतर माझ्या बाळाला फटका मारला म्हणून माझा मारच खाल्ला असता) मग डॉ रंजनाने परत त्याची मान दोन्ही हातात पकडली दुसऱ्या डॉक्टरने खांद्या खाली हात घालून हळू हळू बाळाला बाहेर खेचले. हे सर्व करताना त्याचे तोंड माझ्या विरुद्ध दिशेला होते. त्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. मला बाळाचे प्रथम मागचे डोके, नंतर पाठ नंतर पार्श्वभाग आणि नंतर पाय दिसले. पिशवीतल्या पाण्याने पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. बाहेर आल्यावर थंडी ने गारठून त्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली.
जसे त्याचे पाय पूर्ण बाहेर आले. तसे सर्व डॉक्टर एका सुरात ओरडले, "Congratulations!!!". बाळाला बघून इतका आनंद झाला होता की आपोआप तोंडातून 'Thank you' बाहेर पडले. जसे बाळ पूर्ण बाहेर आले तसे मी हातातल्या घड्याळात किती वाजले ते बघितले. अकरा वाजून १ मिनिटे.(आज तक चा टाईम) पण तिथे आधीच एक मोठे डिजिटल घडयाळ भिंतीवर लावले होते. आणि एक डॉक्टर खास तिथेच उभी होती फक्त बरोबर टाईमिंग बघायला. तिथेच भिंतीवर बोर्ड होता तिथे आम्हा दोघांचे नाव लिहिले होते. वय लिहिले होते. आणि बाळाच्या जन्माच्या तारीख व वेळे साठी जागा होती. त्यांचा घड्याळाप्रमाणे बरोबर ११ वाजून १ सेकंद झाला होता. तो टाईम लगेच तिने बोर्ड वर लिहिला. मी म्हटले ठीक आहे त्यांचे टाईमिंग बरोबर असणार. सकाळी अकरा वाजून एक सेकंद.
बाळाला बाहेर काढल्यावर त्याला बालरोग तज्ञ कडे हवाली करण्यात आले. आणि बाकीचे डॉक्टर तिच्या पिशवीतले इतर पाणी बाहेर काढायच्या मागे लागले. डॉ रंजनाने इतर डॉक्टरांना पटापट करण्यास सूचना दिली व पोट लवकर टाके घालून शिवण्यास सांगितले. मला खाली बसायला सांगितले गेले. पहिल्यांदाच मनुष्याच्या पोटात बघितले होते, पहिल्यांदाच बाप झालो होतो, पहिल्यांदाच बाळाचा जन्म बघितला होता. मी खाली बसलो. बायकोचा हात घट्ट पकडून तिचे अभिनंदन केले. पण आम्हा दोघांना काही समजत नव्हते की आम्हाला मुलगा झालाय की मुलगी? बाजूला असलेल्या लेडी डॉक्टरला आम्ही विचारले तिला पण समजले नाही. ती म्हणाली थांबा सांगते विचारून.
बालरोग तज्ञाने तिकडूनच आवाज दिला. की बाळ चांगले धडधाकट आहे. सव्वा तीन किलो वजन आहे. त्याचे वडील हवं असेल तर ५ मिनिटांनी इथे येऊन बघू शकतात. आमच्या बाजूच्या डॉक्टरने विचारले अरे मुलगा की मुलगी. तो म्हणाला, अगं मुलगा आहे. माझ्यापेक्षा बायको खुश झाली. तिला मुलगा पाहिजे होता. मागच्या संकष्टीला तिला स्वप्न पडले होते की तिला मुलगा झाला आहे आणि ह्या संकष्टी ला तिला मुलगा झाला होता.
बालरोग तज्ञ निघताना मला सांगून गेला की तुम्ही आता बाळाला बघू शकतात. माझे हातपाय आनंदाने थरथरत होते. मी बाळा जवळ गेलो. त्याला गरम हवा येणाऱ्या हिटरखाली ठेवले होते. हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळले होते आणि तो ओंवा ओंवा करून रडत होता. त्याचा सुंदर चेहरा बघून माझ्या अंगावर सरासरीत काटा येऊन गेला.
सर्वप्रथम हिरव्या चादरीतून बाहेर आलेले त्याचे पाय दिसले. सुंदर नाजूक गोरे गोरे पाय. रडण्या बरोबर थरथरत होते. डोळे अजून चिकटलेलेच होते. तसेच डोळे बंद करून तो रडत होता. रडता रडता डोळे उघडायचा प्रयत्न करत होता. पोटात असलेल्या अंधारामधून एकदम बाहेर आल्यावर डोळ्यावर पडणारा उजेड अजून सहन होत नव्हता. पण तरी सुद्धा डोळे उघडायचा प्रयत्न करत होता आणि ते होत नव्हते म्हणून परत रडत होता. पहिली नर्स (जीने मला बाहेर हाकलले होते.) माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही हवे तर तुमचा कॅमेरा आणून फोटो काढू शकता पण फ्लॅश वापरू नका. 'मी ठीक आहे' म्हणून बाहेर गेलो व कॅमेरा घेऊन आलो.
माझ्या बाळाचे फोटो काढले. त्याचे पहिले रडणे रेकोर्ड केले. त्याची डोळे उघडायची पहिली लढाई पहिली. भले त्याच्या आईने त्याला नऊ महिने त्याला पोटात ठेवले असेल. पण ह्या जगात त्याचे स्वागत मी केले. आईच्या आधीही मला त्याला बघायला मिळाले. त्याची पहिली कृती रडणे आणि डोळे उघडणे हे मी स्वत: त्याच्या जवळ राहून अनुभवले. इथे लावलेला हा व्हिडीयो पहा.
हा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. एवढा आनंद दहावी, बारावी पास झाल्यावर झाला नव्हता की नोकरीत कायम झाल्यावर सुद्धा झाला नव्हता. अगदी लग्नाआधी बायकोला प्रेमाची मागणी केल्यावर तिचा होकार आला होता त्याच्यापेक्षा ही आनंद नक्कीच जास्त होता. सहसा हे सुख आईच्या नशिबी जास्त येते. बाळाचे जन्म त्यांच्या शरीरातून होत असल्यामुळे त्यांना बाळाचे पहिले दर्शन होते. पहिला आवाज त्या ऐकतात. पण माझ्या नशिबाने तो आनंद मलापण अनुभवायला मिळाला. अगदी त्याच्या आईच्या आधीसुद्धा मला त्याला बघायला मिळाले हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
परदेशात स्त्रीला डिलीव्हरी करायच्या वेळेस तिच्या नवऱ्याला घेऊन जातात. आपल्याकडे अजून तो ट्रेंड आला नाही आहे. काही मोठ्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नवऱ्याला बायकोच्या डिलीव्हरीच्या वेळेस ऑपरेशन थियेटर मध्ये परवानगी देतात. पण अजून म्हणावी तशी ही पद्धत प्रचलित झाली नाही आहे. माझ्या मित्राची बहिण परदेशातच स्थायिक आहे तिची डिलीव्हरी परदेशात झाली होती. तिच्या नवऱ्याला पण तिच्या डिलीव्हरीच्या वेळेला लेबर रूम मध्ये घेऊन गेले होते. तिथे मुलगा होणार की मुलगी हे आधीच समजले जाते. तिथे गर्भलिंगनिदान सरकारमान्य आहे. कारण तिथे आपल्या सारखे स्त्री भ्रुण हत्या होत नाही. इतकेच काय बाळाचे नाव ही त्यांना आधीच ठरवून हॉस्पिटल मध्ये सांगावे लागते. बाळाच्या आईला जेव्हा हॉस्पिटल मध्ये भरती केले जाते तेव्हा बाळाच्या नावाने सुद्धा फॉर्म भरला जातो. बेड (पाळणा) बुक केला जातो. बाळ जन्मल्यावर आई नॉर्मल होई पर्यंत बाळाला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. पाच दिवस बाळ हॉस्पिटलच्या ताब्यात असते. हे करण्यामागचा उद्देश्य असा की त्याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये. फक्त दोन /तीन तासाच्या अंतराळाने आई ला भेटायला व अंगावरचे दुध भरवायला आईकडे आणले जाते. परत त्याला बाळांच्या रूम मध्ये ठेवले जाते. बाळ अदलाबदली होऊ नये म्हणून त्याच्या पायाचे ठसे घेऊन ते कॉम्पुटर मध्ये रजिस्टर केले जातात. वडिलांना पण काचेतूनच बघायला मिळते.
पण नशीब आपल्याकडे ते एक चांगले आहे. बाळाचा जन्म झाल्यावर बाळ जर नॉर्मल असेल तर त्याला अर्ध्या एक तासात त्याच्या आई वडिलांकडे सोपवले जाते. नाहीतर पाच दिवस बाळाला फक्त बंद दरवाज्यातून बघत राहायचे म्हणजे खूप त्रास झाला असता. ती ताटातूट सहन नसती झाली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्या इथे गर्भलिंगनिदान होत नाही (म्हणजे अधिकृतरीत्या तरी) त्यामुळे लेबर रुमच्या बाहेर राहून आता मुलगा होणर की मुलगी होणार हा आनंद, त्यातली भीती, चिंता काळजी आणि एक अनामिक ओढ हे सर्व सर्व काही अनुभवता येते. त्या ज्या काही भावना, उत्कंठा असतात त्या अवर्णनीय असतात.
बायकोला पुढे लीलावती हॉस्पिटल मध्ये सहा दिवस ठेवले होते. मी सुद्धा सहा दिवस हॉस्पिटल मध्येच राहिलो होतो. जेवण,राहणे, अंघोळ सर्व काही हॉस्पिटलमध्येच होते. पुढील सहा दिवसात कमीत कमी १२ ते १५ डिलीव्हरी झाल्या होत्या पण त्यातील कोणालाच लेबर रूम मध्ये बोलावले नव्हते. मलाच कसे बोलावले ते आश्चर्य आहे. कदाचित भिंगरीला झालेल्या अपघातामुळे आणि तिने सहन केलेल्या त्रासामुळे डॉक्टरांनी मला आत मध्ये यायला परवानगी दिली असेल.
काहीही असो, डॉ रंजना मुळे मला आयुष्यातला एक सुंदर आणि दुर्मिळ अनुभव घेता आला. माझ्या मुलाचा जन्म होताना, त्याला या जगात येताना, पहिल्यांदाच रडताना, पहिल्यांदा इवलेसे डोळे उघडून या जगाला बघताना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव जवळून घेता आला. काही मुली गर्भार असताना अगदी पाय पडून घसरल्यामुळे, किंवा गर्दीत पोटाला धक्का लागून गर्भपात झालेल्या बघितल्या आहेत. पण भिंगरीचा एवढा मोठा अपघात होऊन ती जवळपास १० फुट हवेत उडून रस्त्यावर तिच्या तोंडावर पडली, हनुवटी फुटली, मल्टीपल फ्रॅक्चर झाले पण तरी सुद्धा तिच्या पोटातल्या बाळाला काही झाले नाही. तो सहीसलामत या जगात आला, कदाचित पुढे येणारे दु:ख तो आधीच भोगून सर्व मागचे पुढचे हिशोब चुकता करून आला. एवढ्या मोठ्या अपघात आणि मृत्यूच्या चक्रव्यूहातून त्याने स्वत:ला आणि त्याच्या आईलाही वाचवले. कोण आहे तो? अश्या शूर बाळाचे नाव काय ठेवले पाहिजे?
CONVERSATION
Jigar
CONVERSATION
माझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर
CONVERSATION
In the sky
CONVERSATION
peacock design
CONVERSATION
peacock design
CONVERSATION
Girl -Ink pen sketching
Fast skeching done with Ink pen. Love to work in Ink Pen...as you can't use Eraser and you need to be so perfect for your every stroke.
This is not my original drawing. Original image was from http://shu84.blogspot.in/
शाई पेन ने केलेले जलद स्केचिंग. शाई पेन ने काम करायला खूप आवडते कारण इथे खोडरबर चा वापर करू शकत नाही. प्रत्येक स्ट्रोक परफेक्टच असावा लागतो.
मूळ चित्र http://shu84.blogspot.in/ ह्या साईट वर बघून केलेले आहे.
CONVERSATION
Tree
CONVERSATION
Goddess Saraswati
CONVERSATION
charcoal work
CONVERSATION
nature drawings
CONVERSATION
Subscribe to:
Posts
(
Atom
)
Total Pageviews
Popular Posts
-
आज काय वाटले काय माहित? ऑफिस मध्ये बॉस नव्हता लवकर निघावेसे वाटले. कोणालाच न विचारता पाच वाजता निघालो....मित्राच्या बाईक वरून आलो आणि ट्राफि...
-
ऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...
-
वृत्तपत्रे। ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी । मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...
-
मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस ह्यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा सत्ता स्थापने आधी किंवा शपथविधी सोहळ्यामध्ये अमित शहा ...
-
घटना पहिली जवळपास अठरावीस वर्षांपूर्वी एका मित्राच्या शेजारच्या कुटुंबामध्ये एक अपघात झाला होता. त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा रॉयल एनफील्...
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!