भारत पाकिस्तान सेमी फायनल
भारत पाकिस्तान च्या सामन्यावर खूप काही लिहिले गेले आहे. मी लिहायचा विचार केला कारण कालचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्या आठवणी चांगल्या कोरून राहाव्या म्हणून विचार केला लिहून काढाव्या. आता लहान असलेली जनरेशन किंवा पुढे येणारी जनरेशन नी विचारले कि भारत पाक ची सेमी फायनल कशी होती तर सांगता आली पाहिजे म्हणून लिहून ठेवावीशी वाटतेय. काय भरवसा परत पाक भारत समोर कधी येईल आणि काही दिवसांनी तर तो देशाच्या नकाशावरूनच गायब होण्याची भीती वाटते.
सामना चालू व्हायच्या आधीच २ दिवसापासुन सुट्टी मिळेल कि नाही ह्याची चर्चा चालू होती तेवढ्यात पाक ने त्यांच्या इथे राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली ऐकून आपल्याकडे का नाही झाली ह्याची गरमागरम चर्चा चालू होती. ऑफिस मध्ये काही मित्रांनी सुट्टी टाकली पण, आणि साहेब लोकांनी इमानदारीत मान्य पण केली. माझा एक मित्र म्हणाला कि तू सुट्टी घेऊ नको करून तू सुट्टी घेतली कि आपण हरतो. (आमच्या ऑफिस मध्ये इंटरनेट सर्वाना दिलेले नाही आहे आमच्या ग्रेड ला नाहीच नाही. सुदैवाने एकदा मोठा बॉस खुश असताना त्याच्या कडून परवानगी घेऊन ते चालू केले होते. त्यामुळे मी मटा च्या साईट वर स्कोर बघून सर्व मित्र मैत्रिणींना फटाफट फोरवर्ड करत असतो. अगदीच क्रुशिअल सामना असेल तर रेडीओ वर कॉमेंट्री ऐकत मेल वर लिहून पाठवतो. आमच्या ऑफिस मध्ये क्रिकेट संदर्भातल्या सर्व साईट सर्वर पातळीवरच बंद करून ठेवल्या आहेत. नशिबाने मटा चालू असते म्हणून स्कोर मिळतो.) तर गेल्या काही महत्वाचे सामन्याची मी रनिंग कॉमेंट्री करून सर्वाना अपडेट देत असतो. काही सामन्याच्या वेळेला माझे महत्वाचे काम असल्यामुळे मी सुट्टीवर होतो आणि त्यादिवशी सामना हरलो होतो. असे दोन तीन वेळा झाले ते सुद्धा त्याच मित्राने दर्शविले. तेव्हापासून काही महत्वाचे सामने असेल तर मी सुट्टी घेतच नाही, भले मला बघायला मिळाले नाही तरी चालेल. अर्थात सुट्टी जर ऑफिशिअल असेल तर तो अपवाद असतोच. त्यामुळे ह्या वर्ल्ड कप चे सामने बघायला तरी मिळाले.
तर मित्राने आठवण करून दिल्यामुळे मी सुट्टी टाकायचा विचारच रद्द केला आणि ऑफिस मध्येच राहायचे ठरवले. ऑफिस मध्ये टीवी चा बंदोबस्त होत होता त्यामुळे काही काळजी नव्हती. सकाळपासून सामन्याचे वेध लागले होते. बस, ट्रेन सगळीकडे तीच चर्चा चालू होती. भारतात एका अभूतपूर्व बंदला सुरुवात होणार होती. असा बंद जो कुठल्याही राजकीय पार्टीने पुकारला नव्हता आणि तरी त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल ह्याची खात्री होती, मोठमोठ्या खाजगी ऑफिसेस नी आधीच सुट्टी जाहीर केली होती. काही ऑफिसेस नी अर्धा दिवसाची सुट्टी दिली होती. ज्यांना पूर्ण दिवस होते ते मनातल्या मनात शिव्या घालत कामावर येणार होते. रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने हे रस्त्यावर काढणार नव्हते. सर्व राजकीय नेते रस्त्यावर न उतरता घरात टीवी समोर बसून राहणार होते. मॉल, मल्टीप्लेक्स सगळी रिकामी होणार होती. जिथे टीवी किंवा स्क्रीन चा बंदोबस्त केला होता तिथेच फक्त गर्दी दिसणार होती. रस्ते दोन नंतर ओस पडणार होते, सदानकदा भरलेल्या मुंबईच्या लोकल रिकाम्याच धावणार होत्या. एका अभूतपूर्व बंद ला सुरुवात झाली होती.
ऑफिस मध्ये पोचल्यावर एक सुतकी वातावरण होते. सुट्टी दिली नाही ह्याचे सुतक होते. जसे जसे घड्याळाचे काटे सरकु लागले तस तसे हृदयाच्या धडधडी वाढू लागल्या. एक वाजायच्या आताच जेवणं उरकून घेतली. मटा ची साईट चालू केली आणि बसलो. धोनीने अश्विन ला काढून नेहरा ला घेतले हि बातमी ऐकूनच डोके फिरले म्हटले ह्या माणसाला झालेय काय? सामना जर हातातून गेला तर नक्कीच हा शिव्या खाणार. पण बहुतेक नशीब त्याच्या बाजूने होते. टॉस जिंकून भारताने फलंदाजी घेतली ऐकून आनंद झाला चला सचिन ला सेन्चुरी करायला संधी मिळेल.

पहिले काही ओवर रेडीओ वर ऐकून तर अंगावर काटेच मारायला लागले म्हटले सेहवाग ची अशी फलंदाजी बघायला घरीच राहायला हवे होते. पण काय करणार बॉस समोरच बसून होता स्वत: पण टीवी बघायला जात नव्हता आणि त्यामुळे आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. शेवटी मनाचा हिय्या करून आम्ही दोघा तिघांनी टीवी बघायला जाऊ का विचारले आणि परवानगी मिळाली. तसाच धावत जेवायच्या रूम मध्ये जिथे टीवी लावला होता तेथे पळालो. तेथले वातावरण बघून अंगावर सर्रकन काटा मारून गेला, सेहवागने नुकतेच ५ चौकार मारले होते आणि सर्वच नाचत होते. आम्ही पण जाऊन सेलेब्रेशन करायला सुरुवात केली. पुढच्याच ओवर मध्ये सेहवाग ने उपर कट मारला आणि आम्ही एवढा गोंधळ घातला कि विचारायलाच नको,. प्रत्येक बॉलला गोंधळ चालू होता आणि अचानक सेहवाग पायचीत झाला आणि शांतता पसरली. सेहवाग ने रेव्ह्यू घेतला पण त्यात पण आउटच झाला. पुढची सर्व भिस्त आणि सचिन वर राहिली. पण पीच ला चांगला टर्न मिळत होता पाहिजे तसे शॉट बसत नव्हते.

नशीब अंपायर रिव्ह्यू सिस्टीम चालू केली नाहीतर सचिन अशा बाबतीत खूप अनलकी असतो. आउट नसताना त्याला आउट द्यायची अंपायर लोकांना खूप आवड असते साले मोठ्या फुशारकीने सांगत असतील कि मी सचिन ला आउट दिले आहे. पण कालचा दिवस सचिन चा होता एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा त्याला जीवदान भेटले. काल खरच देवच मैदानात फिरत असावा. जसे ब्रह्मा वर संकट आले कि विष्णू धावत येतो, विष्णू वर आले कि शिवा धावून येतो तसेच क्रिकेटच्या ह्या देवाला सुरक्षा कवच घालून एखादा देवच मैदानावर फिरत असणार. म्हणून तर साधे साधे झेल पाकड्यांच्या हातून सुटत होते.




1 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!