एका मध्यरात्री...

ठवडाभर सेकंड शिफ्ट मध्ये ऑफिस ला येत असल्याने रात्री घरी निघताना उशीर होत होता. म्हणजे कमीत कमी रात्रीचे 12 वाजतच होते. काल पण १२.१५ वाजले. सिप्झ अंधेरीचा एरिया तसा म्हटला तर मुंबईतला खूप गर्दी असलेल्या एरिया पैकी एक...पण औद्योगिक असल्या कारणाने रात्री नऊ नंतर शुकशुकाट होऊन जातो. रात्री सव्वा बारा वाजता तर खूपच रिकामा होता. खाजगी गाड्या, मोठाले डम्पर सुसाट धावत होते. बस स्टॉप वर उभा राहिलो. १०/१५ मिनिटे झाली...बस काही आलीच नाही. एक दोन अशीच उशिरा सुटणारी माणसे स्टॉप वर येउन जात होती. जे काही मिळेल ते पकडून खाजगी टुरिस्ट च्या गाड्या मध्ये बसून जात होती. रात्रीच्या वेळेला मी सहसा अनोळखी लोकांबरोबर जाणे टाळतो त्यामुळे मी स्टॉप वरच उभा होतो. पण जाणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून वाटू लागले की ते नक्कीच माझी मुर्खामध्ये गणती करत होते....कदाचित इथून जाणारी शेवटची बस गेली असावी....आणि मी वेड्यासारखा वाट बघत तिथे उभा होतो.

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला अंदाज आला कि आता काही बस नसणार त्यामुळे रिक्षा च्या भानगडीत पडलेले बरे.....मी स्टॉप वर आल्यानंतर अंदाजे १० मिनिटा नंतर एक मुलगा स्टॉपवर आला होता...अंदाजे १५/१६ वर्षाचा...शिडशिडीत...नुकताच मिसुरडे फुटलेला.... तुडतुडीत...बिचारा आल्यापासून सगळ्या खाजगी टुरिस्ट कारवाल्यांच्या मागे धावत होता...काच खाली करून काही बोलत होता...आणि मग परत स्टॉपवर येत होता...सहसा सगळे टुरिस्ट वाले ऐरोली, वाशी जाणारे असतात...त्याला दुसरीकडे जायचे असेल किंवा किती पैसे/भाडे घेणार ह्यावर ठरत नसेल...म्हणून परत येउन स्टॉप वर उभा राहत होता...मध्येच माझ्याकडे बघत होता....परत टुरिस्ट चा गाडीकडे धावत होता....ह्या वयात असणारा चंचल पणा त्याच्या देहबोलीतून जाणवत होता....त्याचे अस्थिर मन आणि त्याचे वय त्याला एका जागी उभे करूच शकणार नव्हते...मला उगाचच माझ्या त्या वयाची आठवण झाली...मी पण थोड्याफार फरकाने असाच असेन...आणि आता मी तिशी पार केलेला...थोडी फार मच्युरिटि आलेला (असे फक्त म्हणायचे असते)...स्थिरता आलेला....किंवा सुस्तावलेला शरीराचा...गप्प एका जागी उभा राहून त्याच्या हालचाली बघत होतो.

 जेव्हा १५/२० मिनिटे उभा राहून बस आली नाही....तेव्हा माझ्यातला ‘स्थिरता’ वाला माणूस गळून पडायला लागला... चुळबुळ चालू झाली...आणि मी न राहवून शेवटी माझा पाय उचलला आणि जागच्या जागी हालचाल करू लागलो...अजून दोन माणसे स्टॉप वर आली....मागून आलेल्या टुरिस्ट्च्या इंडिका मध्ये बसून निघून गेली...हा मुलगा परत स्टॉप वर येउन उभा राहिला...ह्या वेळेस थोडा जवळ येउन उभा राहिला...माझ्या कडे बघून बोलायचे होते त्याला पण कदाचित माझ्या धिप्पाड पणाकडे बघून किंवा मोठ्या मिश्याकडे बघून हिम्मत होत नसावी(हा पण माझाच अंदाज)....शेवटी मीच दया येउन विचारले...

‘क्या रे किधर जाने का ही तुझे?? (समोरचा हिंदी असावा असा नेहमीचा टिपिकल गैरसमज करून)

तो म्हणाला... ‘मुलुंड चेक नाका’...परत दोन सेकंद पॉज घेऊन.... ‘उसके आगे वागले इस्टेट जाने का है’

(चुकून हा माणूस तिकडेच जात असावा हा तर आधीच सांगून टाकावे नंतर लफडी नकोत ह्या अर्थाने त्याने पॉज घेऊन पुढ़चे ठिकाण पण सांगून टाकले....कारण मुंबई च्या रिक्षा फक्त मुलुंड चेकनाका पर्यंत जातात मग पुढे ठाण्याची वेगळी रिक्षा घ्यावी लागते...असो..)

 त्याच्या योगायोगाने म्हणा किंवा माझे घर तेथे असल्यामुळे मी पण ठाण्यालाच जात होतो. त्याला विचारले...'अभी बस नही है क्या रे?'...तो उत्तरला.... ‘नहीं...लास्टवाला बस पोवने बारा का था...कब का गया होगा'...आता मला स्टॉप वर येउन जाणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव बरोबर ओळखल्याचा मनातल्या मनात आनंद होत होता...तेव्हढ्यात एक रिक्षा समोर येउन उभी राहिली...भाडे उतरले...सुट्ट्या पैशाची देवाण घेवाण मराठीत झाली...म्हणजे रिक्षावाला मराठी असावा...मी विचारले...चेक नाका येणार का? (इमानदारीत मराठीच विचारले)...तो लांबचे भाडे मिळणार म्हणून खुश होऊन चार वेळा मान हलवून... ‘हां साब!! जायेगाना...बैठो बैठो....(आयचा घो ह्याचा...आता मी मराठी बोलतोय आणि हा हिंदी...)

 त्या मुलाला हाक मारली....'ए हिरो!!....इधर आ!!...बैठ ऑटो में'...तो धावत आला आणि भोळ्या चेहऱ्याने विचारले...'साब लेकिन किधर जा राहे हो...और कितना पैसा लेगा.'.....'अरे में भी थाना जा रहा हुं...बैठ चुपचाप'...मी उत्तरलो...परत त्याने विचारले...'लेकिन कितना पैसा लोगे साब??'....


मी रागाने...'दो सो रुपया लेगा...बैठ बोल न चुपचाप'...

'लेकिन???' परत त्याचा प्रतिप्रश्न....

'अरे भाई नहीं लेगा तेरे से पैसा...बैठ इधर'...तसा तो खुश झाला आणि बसला...

रिक्षावाला बहुतेक फॉर्म्युला वन मध्ये कोणीतरी खुन्नस काढून रिजेक्ट केला असावा आणि त्याला रिक्षावाला बनवला असावा...आणि त्यामुळे फॉर्म्युला वन ची भडास रिक्षावर काढावी तसा चालवत होता...आपली लोक पण रस्त्यावर खड्डे असतात खड्डे असतात अशी उगाच बोंब मारत असतात...रिक्षावाल्यांना विचारावे..त्यांना रस्त्यावरचा एकही खड्डा दिसत नाही...पाण्यावर उडणारे जेट प्लेन असल्याच्या अविर्भावात त्याने रिक्षा चालवली.....चार पाच वेळा अपघात झालेला माणूस नाही म्हटला तरी किती धीर धरणार...पण मी धरून ठेवला..रस्त्यावरचे लक्ष हटवून त्या मुलाला त्याचे नाव विचारले...

मी: ‘नाम क्या है रे तेरा??’ 

‘शाहनवाज....’...तो उत्तरला. 

मी: ‘इतने रात गये इधर क्या कर रहा है?’ 

तो: ‘वो मेरा मामा का इधर कॉन्ट्रकट (contract)है...होटल में...शेर-ए-पंजाब में...उधर से आया हु’

मी: ‘होटल में काम करता है क्या?’

तो: ‘हां साब!!’ 

मी: ‘अच्छा!!! फिर इतने दूर से इधर आता है?’

तो: ‘हां मामा ने बोला न इसलिए’. 

‘मी: फिर कितना कमाता है?’ 

तो: दिन का २५० रूपया.’

मी: ‘और टिप्स वगैरा मिलता है क्या?’

‘हां! मिलता है लेकिन सब को मिलबाट के लेना पड़ता है...शेफ और वेटर लोगों को ज्यादा मिलता है....मुझे जो मिलता है...वो रात को भाड़ा में निकल जाता है’….तो उत्तरला. 

मला पण उगाचच माझे उमेदीचे (?) दिवस आठवले... बॉस रात्री उशिरा पर्यंत काम करून घ्यायचा आणि उशिरा घरी गेलो म्हणून कधीच ओवर टाईम किंवा जाण्या येण्याचे भाडे नाही द्यायचा... मी पण स्वताचे खिशातले पैसे घालून प्रवास करायचो...मनातल्या मनात त्याला दोन तीन शिव्या घातल्या......तश्याच काही भावना त्याच्या मनात पण असतील बहुतेक...

मी: ‘कॉलेज वगैरे जाता है की नहीं?’ 

तो: ‘हां जाता हु ना...मोर्निंग को.. १४वि में हुं’

मी: ‘अच्छा! फिर डेली ऐसे हि जाता है क्या?’ 

तो: हां साब कभी कभी बस मिलता नहीं...दुसरा गाडी भी नहीं मिलता...फिर वापस होटल जाकर सोता हु....

मी: ‘लेकिन बस स्टॉप से होटल बहोत दूर हैं ना...’

तो: ‘हां फिर चलकर जाता हुं...’

‘अच्छा!’...मी हुंकारलों. 

मला उगाचच त्याची दया आली पण नंतर वाटले आपल्याला काय हक्क आहे त्याच्यावर दया दाखवण्याचा...तो स्वत: मेहनत करतोय आणि नोकरी करून शिक्षण करतोय....त्याला होणाऱ्या त्रासाचा साधा लवलेश ही त्याच्या चेहऱ्यावर नाही आणि आपण कोण एवढे मोठे लागून गेलो त्याच्यावर दया दाखवायाला…. आज तुझ्या कडे थोडे पैसे आले आणि तुझी रिक्षाने जायची योग्यता आली म्हणून काय तू दुसऱ्याला तुझ्या पेक्षा कमी योग्यतेचा ठरवणार का?... तुझ्या पुढेही काही लोक आहेत ज्यांची टॅक्सी करून जायची योग्यता आहे किंवा स्वत:च्या कार ने जायची योग्यता आहे मग त्या लोकांनी तुला कमी लेखलेले चालेल का? नाही ना!!! मग हा अधिकार तुला कोणी दिला?? मनात द्वंद्व चालू असतानाच मुलुंड चेकनाका आला...  

स्टॉप आल्यावर तो उतरून उभा राहिला...

मी विचारले...क्या हुआ?

त्याने डोके खाजवत विचारले... ‘साब वो...’

मी म्हणालों... ‘चल भाग...मैंने बोला था ना की पैसा नहीं लेगा तेरेसे..

तो: फिर भी साब.....??

मी: अरे !! भाग बोला ना तुजे अब...नहीं तो पूरा पैसा देने के लिए बोलूँगा...

तसा तो खुश होऊन पळत सुटला. त्याच्या तुडतुड्या स्वभावाकडे आणि उड्या मारत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृती कडे बघून मी मनात म्हटले ‘देवा!! अशी माणसे आयुष्यात थोड्या थोड्या अंतराने मला भेटत राहु देत....माझे पाय जमिनीवर रहायला मदत होते.’
 
 

CONVERSATION

2 comments:

  1. मस्त जमलंय. खरंय अगदी पाय जमिनीवर रहायला हवेत..... :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ब्लॉग पूर्ण वाचून कमेंट केल्याबद्दल

      Delete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top