राम आणि रावण

राम आणि रावण ह्यात श्रेष्ट कोण हा वाद नेहमीचाच. रक्षाबंधन वरून आलेल्या एक फोरवर्ड मेसेज मधून रावण हा चांगला भाऊ होता  आणि राम नव्हता. ह्या वरून एका मित्राने रामाचे गुण सांगितले आणि राम बरोबर होता हे पटवायचा प्रयत्न केला. त्याने दिलेल्या गोष्टी आपल्याला लहानपणा पासून जे रामायण शिकवण्यात आले त्या प्रमाणे योग्य आहेतच. पण जर दुसर्या पातळीवर अथवा मनुष्य पातळीवर विचार केला असता काही विचार मला पटत नव्हते. काही गोष्टी मला नाही पटल्या म्हणून हा लेख प्रपंच

रावणाची बहिण शुर्पणका हि लक्ष्मणाच्या मागे लागली होती आणि लक्ष्मणाने आधीच विवाहित असल्यामुळे तिला नकार दिला तरी सुद्धा ती त्याच्या मागेच लागली होती ह्यावरून ती व्यभिचारी होती हा अर्थ काढणे चुकीचा होतो.


रावण, शुर्पणका हे राक्षस कुळातल्या होत्या म्हणून ते दिसायला कुरूप होते हा अर्थ काढणे चुकीचे आहे. शुर्पणका हि राक्षसकुळातील असली तरी एक शूर, हुशार राजाची बहिण होती पर्यायाने राजघराण्यातली होती. दिसायला चांगलीच असावी (माझे मत). राजघराण्यात येणारा मानी पणा किंवा तिचा शूर भावाचा असलेला पाठींबा ह्यामुळे कदाचित तिच्यात घमेंडी अथवा हट्टी पण तिच्यात ठासून भरला असावा. राम आणि लक्ष्मण वनवासात ऋषी कुमारच्या वेशात असत. रामा बरोबर त्याची पत्नी सीता पण वनवासात होती. पण लक्ष्मण हा आपल्या पत्नी ला घेऊन आला नव्हता.

त्यामुळे लक्ष्मण अविवाहित असण्याचा समज शुर्पणकाचा का होऊ नये? लग्न झाले म्हणून पुरुष काही मंगळसूत्र गळ्यात घालत नव्हते. तिच्या दृष्टीने राम विवाहित होता आणि लक्ष्मण अविवाहित होता. अविवाहित पुरुषावर प्रेम करणे किंवा त्याची ओढ लागणे हा कसला आलाय व्यभिचार. लक्ष्मण जेव्हढा दिसायला चांगला होता तेव्हढाच राम हि असावा ती जर व्यभिचारी असती तर ती रामाच्या पण मागे लागली असती. पण ती एकट्या लक्ष्मणच्या मागे लागली होती हे लक्षात घेण्यासारखे.

शिवाय राक्षस कुळातील लोकांना ऋषी कुमारांशी लग्न करण्यास प्रथम पसंती होतीच. रावणाची व शुर्पणका ची आई कैकसी हि राक्षस कुळातील होती आणि तिने विश्रवा ऋषीशी (ब्राह्मण) लग्न केले होते.


रामायणामध्ये तिच्या आधीच्या काही लग्नाची किंवा प्रेमप्रकरणाची चर्चा झालेली दिसत नाही त्यामुळे ती व्यभिचारी असावी असे मला तरी वाटत नाही. लक्ष्मणाने सांगितले असेलही कि मी विवाहित आहे तरी सुद्धा तिने त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरला असेल तर त्यात चुकीचे काय आहे. त्या काळात राजघराण्यात अनेक पत्नी असणे ह्यात काही चुकीचे नव्हते..राम लक्ष्मण ह्यांच्या वडिलांचे दशरथ राजाच्या पण तीन बायका होत्याच. मग तो पण व्याभिचार होतो का?

कदाचित ती लक्ष्मणाच्या मागे लागली होती म्हणून तिला सबक शिकवण्यासाठी लक्ष्मणाने तिचे नाक कापले असावे. (एक स्त्रीवर हात उचलला अथवा शस्त्र चालवले...का ते माहित नाही? आणी त्याला रामाची सन्मती होती हे विशेष)

आता रावणाला आपल्या बहिणीबद्दल आस्था असण्यात काय चुकीचे आहे. त्याच्या मते ती राजकुमारी होती आणि तिचे हट्ट पुरवण्यासाठी किंवा प्रेम मिळवण्यासाठी केलेला अट्टाहास ह्यात तिचीच चुकी आहे असे का वाटावे. आज जर माझ्या बहिणीची काही चुकी झाली असेल आणि जर तिला कोणी बाहेरचा व्यक्ती त्रास देत असेल तर मी पहिले बाहेरच्या व्यक्तीचा बंदोबस्त करेन आणि मग माझ्या बहिणीची कान उघडणी करेन. रावणाने पण तेच केले असावे पण रावणाला वाईटचं ठरवण्यात आल्यामुळे त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी रामायणात दुर्लक्षित झाल्या असाव्यात. कारण तो न्यायप्रवीण होता हे सगळ्यांचा चांगलेच माहित आहे. तो इतका न्याय करू शकला नसेल असे नाही पटत.

 एका पराक्रमी राजाने / भावाने आपल्या बहिणीवर झालेल्या हल्ल्याचा/ अपमानाचा बदला घेतला तर त्याच चुकले काय? राज्य सत्ता संपत्ती त्याने स्वकष्टाने मिळवली होती त्याच्या त्याला अभिमान अहंकार असणे स्वाभाविक आहे....त्याच गोष्टी त्याच्या लयास कारणीभूत ठरल्या असाव्या.


असे म्हटले जाते कि बहिणीच्या अपमानाचा बदल घ्यायचा होता तर राम लक्षमण ह्यांना गाठून युद्ध करायचे होते. मारीचाला हरीण बनवून आणि स्वत: साधू बनून सीतेला पळवले. त्याने भ्याड हल्ला केला असे म्हटले जाते.


राम लक्ष्मण ह्यांनी पण एका एकट्या स्त्री वर हल्ला करून किंवा तिचे नाक कापून काही शूर पराक्रम गाजवला होता असे मला वाटत नाही. रावण हा दश विद्या ६४ कला जाणणारा /शिकलेला उत्कृत्ष्ट राजा होता. राम लक्ष्मणाने एका स्त्रीवर केलेल्या हल्ल्याचा जवाब त्याने त्यांच्या स्त्रीचे हरण करून दिला त्यात परिस्थिती नुसार त्याचे काही चुकले असावे असे मला वाटत नाही. तो हुशार अनुभवी योद्ध होता लढाई करून तो सीतेला घेऊन जाऊ शकला असता. पण जे दु:ख त्याला त्याच्या बहिणीचे नाक कापून झाले होते ते दु:ख त्याला रामलक्ष्मणाला जिवंत ठेवून द्यावयाचे असेल असे मला प्रथम दर्शनी वाटते.


मारीचाला सोन्याचा/सोनेरी हरीण बनवून रावणाने त्याला पाठवले असे म्हटले जाते. ह्यवरुन तो पाताळयंत्री होता असे मानले जाते. मानवी पातळीवर माणसाचा हरीण होणे शक्य नाही वाटत पण समजा काही मायावी शक्ती असावी. पण ती वापरण्यामागे रावणाचा कदाचित रक्तपात न करता सबक शिकवण्याचा उद्देश्य असू शकतो.

दुसऱ्याची भार्या उचलून नेणे हे त्याकाळी राजे लोकांत सरार्स चालायचे. वालीने सुग्रीवास हरवून त्याच्या बायकोचे हरण केले होते. पुढे सुग्रीवाने रामाच्या मदतीने वालीस ठार करून त्याच्या व स्वताच्या बायकोस आपल्या घरी आणले होते. हि त्यावेळी समाजातील एक रीत असावि. अगदी १७व्य शतकापर्यंत जिंकलेला राजा हरलेल्या राजाच्या पत्नीशी किंवा मुलीशी लग्न करत असे. रावणाने चालू असलेल्या प्रथे प्रमाणे आपले आचरण केले.....आजच्या युगात ते कदाचित चुकीचे असू शकते. पन त्यावेळेस तशिच रित होति. त्यासाठी पूर्णपणे रावणास दोष देणे चुकीचे ठरेल.

रावणाने सीतेला पळवून नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली नाही कारण त्याला ब्रह्मदेवाचा शाप होता असे म्हटले जाते. कोण ब्रह्मदेव आणि कशाला शाप दिला होता. मानवी पातळीवर बघितले तर रावणाने सर्वाना जिंकले होते. असे म्हटले जाते की त्याने आपले भविष्य आपल्या हाती राहावे म्हणून राहू केतू शनी सह सर्व ग्रह आपल्या कडे बंदिस्त करून ठेवले होते. तो ब्रह्मदेवाच्या शापाला का घाबरेल? एक शक्यता पकडली की त्याला खरच शाप होता. पण तरी सुद्धा त्याने एवढे दिवस सीतेच्या चरित्राचे रक्षण केलेच होते. प्रत्येक वेळेस अशोक वाटिका मध्ये येऊन त्याने सीतेला लग्नाची फक्त विनवणी केली होती.


त्याला तिचे शील हरण करायचे असते तर आपल्या भाऊ, मुलगा ह्यांच्या करवी तिचे शील हरण अथवा जबरदस्तीने उपभोग करवू शकला असता. उलट त्याने तिला राजवाड्यात न ठेवता वेगळ्या वनात ठेवून तिचे चारित्र्य अबाधित ठेवले. त्याकाळात सर्व सूत्रे आणि परिस्थिती त्याच्या हाती असताना सुद्धा त्याने स्वत:वर व स्वत:च्या विचारांवर आवर घातला ह्यात त्याचे कौतुक नक्कीच करण्यासारखे आहे. त्यात त्याची मजबुरी तर नक्कीच नव्हती.

रावणाने रामाचे रूप धारण करायचा प्रयत्न केला होता आणि सीतेला विनवणी करायचा प्रयत्न केला होता हे माझ्या तरी वाचनात अजून आले नाही. मानवी पातळीवर तरी मला ते शक्य वाटत नाही. कालखंडाचा अनुमान लक्षात घेता राम आणि रावण ह्यांच्यामध्ये कमीत कमी ३० ते ४० वर्षाचे अंतर असावे. रावणाने राम सारखा दिसण्याचा प्रयत्न केला असावा असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे ह्यावर टिपण्णी करणे योग्य होणार नाही

राम हा अवतारी पुरुष होता हि संकल्पना मला पटत नाही. तो एक कल्याणकारी राजा होता त्याने चालवलेल्या राज्य पद्धतीने आणि पराक्रम मुळे आणि वाल्मिकी ऋषीनी लिहिलेल्या रामायणमुळे तो इतिहासात नोंदला गेला. पुढे इसवी सनाच्या आधी वैदिकी करणाच्या काळात किंवा हिंदू धर्माच्या पुनरुथानाच्या काळात श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांना अवतारी पुरुष म्हणून गणले गेले. त्यांना विष्णूचा अवतार मानले गेले. तसे अगदी अलीकडच्या कालपर्यंत गौतम बुद्ध ह्यांना पण मानले गेले. जर इंग्रज आले नसते आणि इतिहास बखरी नोंदल्या गेल्या नसत्या तर शिवरायांना सुद्धा आपण अकरावा अवतार मनाला असता. त्यांचे न केलेले चमत्कार मानून आपण त्याचे देऊळ बांधले असते.

  त्यामुळे तो अवतारी पुरुष होता ह्या संकल्पना जर बाजूला ठेवून रामाकडे फक्त मानवी पातळीवर एका राजाच्या दृष्टीकोनातून बघुया. तो आज्ञाधारक पुत्र, दिलदार भाऊ,एकनिष्ठ पती, अद्वितीत्य कल्याणकारी राजा, समंजस, गुणवंत होता हे सगळे मान्य आहे म्हणूनच आज ५ हजार वर्षानंतर सुद्धा त्याचे नाव घेतले जाते. तो पुरुषोत्तम होता ह्यात शंकाच नाही. म्हणून रावण दुष्ट निर्दयी होता हे मानणे  चुकीचे आहे.


राम हा राजा होता त्या काळी कितीही लग्ने केली तरी चालत, स्वतः रामाचे वडील दशरथ यांनी तीन लग्ने केली हि वस्तुस्थिती असताना रामाने सितेशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार कधीही केला नाही कारण तो पत्नीनिष्ठ होता ह्याबद्दल रामाचे कौतुक करावे ते थोडेच आहे.

पण रामायणाच्या नोंदीनुसार रावण सुद्धा एक पत्नीव्रता होता. तो अनेक लढाया जिंकून आला होता. पण कुठल्याही राजाच्या पत्नी अथवा मुलीबरोबर विवाह केला ह्याचा कुठे उल्लेख नाही. सीतेला उचलून आणे पर्यंत तरी तो एक पत्नीव्रता होता. इतकेच काय त्याने सीतेचा जबरदस्ती उपभोग न घेता (जर शाप नाही असे समजले तर) तिला लग्नाच्या मागणी घालती होती. तो राजा होता आणि त्याच्या मर्जी विरुद्ध तो लग्न नक्कीच करू शकला असता. जरी शाप असल्या प्रमाणे उपभोग घेऊ शकला नसता तरी तिचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी तिच्याशी लग्न नक्कीच करू शकला असता. ह्यावरून तरी तो स्त्रीलंपट होता असे वाटत नाही. का फक्त रामाला अवतारी पुरुष ठरवण्यासाठी आणि रावणाचे अवगुण दाखवण्यासाठी त्याच्यावर शापाचे कारण टाकले गेले असावे.

रामराज्य नक्कीच चांगले असावे ह्यात वाद नाही. पण रावणाने पण आपले राज्य चांगले चालवले होते. त्याने प्रजेवर अन्याय केला असे कुठे लिखित नाही त्याच्या काळात लंकेचा सुवर्णकाळ होता हे तर जगजाहीर आहे. सोन्याच्या लंका हे जर सोने हा धातू न समजत घेतले तर उत्कृष्ट राज्यव्यवस्था (सोन्याचे राज्य, अप्रतिम राज्य) असा होऊ शकतो. त्याच्या एका इशाऱ्यावर त्याची प्रजा आपल्या राजासाठी रामाबरोबर लढण्यास तय्यार झाली होती. त्याने पिढ्यान पिढ्य राक्षस कुलावर होणारा अन्याय सहन न करता त्यांना एकत्र आणले स्वताचे राज्य वसवले आणि त्यात सर्वाना थारा दिला. शून्यातून त्याने राज्य निर्माण केले होते. नक्कीच तो त्याच्या प्रजे साठी कल्याणकारी राजा होता.संपूर्ण रामायणात कुठेच रावणाने अत्याचार केला आहे असे माझ्या तरी वाचनात आले नाही.

आता राहतो मुख्य प्रश्न अग्नीपरीक्षेचा, सीता काही वर्षे दुसऱ्या घरी इतके वर्षे राहिली म्हणून तिला अग्नी परिक्षा द्यावी लागली. आता पर्यंत कुठल्या पुरुषाला अशी परिक्षा द्यावी लागली असे ऐकण्यात नाही. हि अग्नी परिक्षा कशी असावी त्याबद्दल अंदाज नाही. टिव्ही वर दाखवल्या प्रमाणे तिने जळत्या चितेवर बसून परिक्षा दिली होती. ती पवित्र असल्यामुळे तिला अग्नी जाळू शकला नाही असे म्हटले जाते. मानवी पातळीवर ते नक्कीच शक्य नाही. त्या कालच्या प्रचिलित पद्धतीप्रमाणे तिने काही अग्नीपरिक्षा दिली असावी आणि ती त्यातून पार झाली असावी असे गृहीत समजू

ती परिक्षा रामाला का लागू झाली नाही? तो हि तिच्या शिवाय काही काळ राहिला होता ...असो. रामायणात उल्लेखील्या प्रमाणे अग्निपरीक्षा लंकेत झाली आणि मगच रामाने तिचा स्वीकार केला आणि मग त्या उभयन्ताने बिभीषणाला आशीर्वाद देऊन लंकेचे राज्य त्यांच्या हवाली केले. राम लक्ष्मण पुढे अयोध्येत येऊन राज्य करू लागले. पुढे एका धोब्याच्या मनात आलेल्या शंके वरून त्याने प्रजेला आपल्या बायकोच्या चारित्र्यावर शंका आहे असे गृहीत धरले. त्या अनुषंगाने त्याने सीतेचा त्याग केला...वाह!!! तो किती प्रजेची काळजी घेणारा पुरुषोत्तम होता. ह्याबद्दल त्याचे इतिहासात नेहमीच कौतुक केले जाते. त्याकाळातील परिस्थिती नुसार त्याने प्रजेचे शंका निस्सारण करण्यासाठी योग्यचे केले असावे गृहीत समजूया.

पण मी जर रामाच्या जाग्यावर असतो.१.      तर मी नक्कीच प्रजेला सांगितले असते. की तिने हजारो लोकांच्या साक्षीने अग्निपरीक्षा दिली आहे आणि माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. २. मी दुसऱ्या कोणाला माझ्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला दिले नसते. ३. ती गरोदर असताना तिला जंगलात बेभरोसे तर कधीच सोडले नसते. ४. जर माझे पितृवचन पाळून नवीन लग्न झालेली, राजघराण्यात राहिलेली राजकुमारी माझ्या बरोबर १४ वर्षे वनवासात यायला तय्यार असेल तर तिच्या त्याग करताना मी दहा वेळा विचार केला असता. Hats off त्या पवित्र सीतेला जी सगळे ऐशोआराम सोडून १४ वर्षे वनवासात राहायला गेली. ५. मला प्रजेच्या सुखासाठी जर तिचा त्याग करावा लागत असेल तर मीही तिच्या प्रमाणे राज्य/ऐशोआराम त्याग करून तिच्या बरोबर वनवासात गेलो असतो. असे तसे राज्य १४ वर्षे आणि अधिक १-२ वर्षे भरताने सांभाळले होतेच. पुढेही चालवले असते. ६. ह्याला पत्नी प्रेमं म्हणावे की राज्य चालवण्याची लालसा माहित नाही. ७. जर वर म्हटल्या प्रमाणे ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला होता त्यामुळे रावणाने सीतेला हात लावला नाही हे जर सत्य असेल तर रामाने ते आपल्या प्रजेला छातीठोक पाने का नाही सांगितले. रावणाचा शाप सगळ्यांना माहित होता तर रामाच्या प्रजेला माहित नव्हता का?

पुढे उत्तर रामायणात (जे बहुधा वाल्मिकी रचित नाही) लव आणि कुश संगीत रामायण म्हणतात तेव्हा रामाला आपल्या चुकीची कल्पना येते आणि तो सीतेला परत बोलावतो असे म्हटले जाते आणि तेव्हा सुद्धा सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली जाते.  का? कशासाठी ? ह्या वेळेस ती अग्नी परीक्षा न देत धरती मातेला आपल्या पोटात घ्यायला सांगते व ती पवित्र असल्यामुळे तेव्हा धरती माता तिला आपल्या पोटात घेते. (अर्थात मानवी पातळीवर सीता त्यावेळेस आपल्या शेवटच्या घटिका मोजत असावी व दरबारात येत असताना अथवा आल्यावर तिचा मृत्यू झाला असावा.) बिचारी एवढे दु:ख आणि यातना सोसून आपल्या चारित्र्याचे रक्षण करून, अग्नी परिक्षा देऊन सुद्धा तिच्या नशिबी असे भोग यावे ह्याबद्दल नक्कीच वाईट वाटते. ह्याला रावण जेवढा जवाबदार असेल तेव्हढाच श्रीराम सुद्धा...


Image source:Internet

वणाने/ शूर्पणखे ने प्राप्त्य परिस्थितीत काही चुकीचे केले असे मला वाटत नाही...उलट काही गोष्टी रामाच्या चुकल्या असे मला वाटते. पण एक रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसऱ्या रेघेला नेहमीच कमी केले जाते....तेच बहुतेक रावणाच्या बाबतीत झाले असावे. चुका दोघांनी केल्या होत्या कारण ते मानव होते. अवतार किंवा देव पण त्यांना नंतर दिले गेले असावे.

मी रामाच्या विरोधात नाही किंवा रावणाच्या बाजूने नाही फक्त मला वाटलेले विचार मांडले आहेत. माझ्यासाठी राम जेवढा श्रेष्ट तेव्हढाच रावण सुद्धा

आशिष सावंत

CONVERSATION

1 comments:

  1. तुमची मतं ठीक आहेत. लेख माहितीपूर्ण आहे. पण मारुतीच्या शेपटा प्रमाणे लांबलाय.

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top